Join us  

मुंबईकरांनो, जुलैपर्यंत पाण्याचे नो-टेन्शन! धरणांत ९५ टक्के पाणीसाठा, ४ तलाव ओव्हरफ्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 10:18 AM

राज्यासह मुंबई, ठाणे परिसराला जुलैमध्ये झोडपून काढणाऱ्या पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीला मोठा ब्रेक घेतला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: राज्यासह मुंबई, ठाणे परिसराला जुलैमध्ये झोडपून काढणाऱ्या पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीला मोठा ब्रेक घेतला होता. मात्र, मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. सातपैकी पाच जलाशये भरून वाहू लागल्याने मुंबईकरांच्या पुढच्या वर्षीच्या जुलैपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे.

मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज तीन हजार ९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. सध्या धरणांमध्ये १३ लाख ७८ हजार ५७७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने ही वाढ दिसून आली आहे.

दुसरीकडे मुंबईतील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी येत आहे. पाणी गळतीमुळेही ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी जल अभियंता खात्याला सूचना देऊन या सर्व समस्या तत्काळ सोडविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. 

चार तलाव झाले ओव्हरफ्लो-

तुळशी तलाव २० जुलैला, तानसा तलाव २४ जुलैला, विहार तलाव २५ जुलैला मोडक सागर तलाव २५ जुलैला भरून वाहू लागला आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकापाणी