Join us  

कोस्टल रोडची उत्तरवाहिनी आजपासून सेवेत; हाजी अली ते सी-लिंकपर्यंत प्रवास वेगवान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 9:45 AM

कोस्टल रोडचे एकूण ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे.

मुंबई: कोस्टल रोड प्रकल्पातील उत्तरवाहिनी मार्गावर हाजी अलीपासून पुढे खान अब्दुल गफार खान रस्त्यामार्गे वरळी-वांद्रे सी- लिंकपर्यंतचा प्रवास गुरुवारपासून मुंबईकरांना करता येणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून ही वाहिनी वाहनांसाठी खुली केली जाणार आहे. रात्री ११ वाजेपर्यंत या मार्गावरून प्रवास करता येईल. मात्र, शनिवारी आणि रविवारी वाहिनी बंद असेल.

कोस्टल रोडचे एकूण ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत कोस्टल रोड बांधला जात आहे. या मार्गाचा काही भाग यापूर्वीच टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

टप्प्याटप्प्याने केले लोकार्पण-

१) वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने या मागचि लोकार्पण करण्यात आले होते.

२) कोस्टन रोड प्रकल्पातील बिंदूमावव चौक ते मरिन ड्राइव्ह ही दक्षिणवाहिनी मार्गिका ११ मार्चपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

३) त्यानंतर मरिन ड्राइव्ह ते हाजी अलीमार्गे लोटस जंक्शनपर्यंत उत्तर दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे १० जूनला लोकार्पण करण्यात आले होते.

३.५ कि.मी.चे काम पूर्ण-

१) आता हाजी अली ते खान अब्दुल गफार खानपर्यंतच्या उत्तर दिशेने जाणाऱ्या ३.५ किलोमीटर मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून, ही मार्गिका गुरुवारपासून सुरू केली जाणार आहे. या मार्गिकेवरून फक्त सी-लिंकला जाता येईल. वरळी आणि प्रभादेवी परिसरात जाण्यासाठी डॉ. अॅनी बेझंट मार्ग व खान अब्दुल गफारखान मार्ग या नेहमीच्या रस्त्यांचा वापर करावा, अशी सूचना पालिकेने केली आहे.

२) एका अर्थाने मरिन ड्राइव्हपासून  कोस्टल रोडमार्गे खान अब्दुल गफारखान मार्गाचरून फक्त सी- लिंकला जाता येईल. तसेच लोटस जंक्शनवरून सी-लिंकला जाण्यासाठी आंतरबदलातील एक मार्गिका (आर्म ८) सुरु करण्यात येत आहे.

कोस्टल रोडची वैशिष्ट्ये-

१) रस्त्याची लांबी १०,५८ कि. मी. 

२) मार्गिकांची संख्या प्रत्येकी ४ वाप्रमाणे ८  मार्गिका. 

 ३) बोगद्यात प्रत्येकी तीन मार्गिका.

४) भराव टाकून बनवलेल्या रस्त्याची लांबी ४.३५ कि.मी.

५)  पुलांची एकूण लांबी २.१९ कि.मी.

६)  बोगदे-दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकी २.०७ कि.मी.

७) पहिला बोगदा जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण.

८) दुसरा बोगदा मे २०२३ मध्ये पूर्ण.

९) भूमिगत वाहनतळ ४, वाहनसंख्या १८००.

१०) नवीन पदपथ ७ कि.मी.

११)  बससाठी स्वतंत्र मार्गिका.

१२)  सागरी तटरक्षक भिंत ७.४७ कि.मी.

असा होणार फायदा-

१) तटरक्षक भिंतीमुळे सागरी किनाऱ्याचे धूप होण्यापासून संरक्षण

२) ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्माण झाल्यामुळे प्रदूषण कमी.

३) हाजी अली व महालक्ष्मी मंदिर या धार्मिक स्थळांजवळ तसेच वरळी येथे पार्किंगची सुविधा. 

४) हरित क्षेत्रात सायकल ट्रैक, सार्वजनिक उद्याने, खुले प्रेक्षागृह.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाएकनाथ शिंदेरस्ते वाहतूकवरळी