Join us  

'माझी लाडकी बहीण'साठी ही कागदपत्रे आवश्यक; अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 11:12 AM

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. एकाचवेळी अनेक महिला अर्ज भरण्यासाठी जात असल्याने जागोजागी रांगा लागत आहेत. मात्र आता सरकारने या योजनेसाठी अर्ज भरायला मुदतवाढ दिली आहे. पात्र महिलांना अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच अर्ज करण्याची प्रक्रियाही सोपी केली आहे. या योजनेतून पात्र महिलेला दरमहा १५०० रुपये दिले जाणार असून या माध्यमातून एका वर्षात १८ हजार रुपये मिळतील, यामध्ये ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै महिन्याचेही पैसे दिले जातील.

उत्पन्न मर्यादा काय-

१) अडीच लाखांच्या आतील उत्पन्नाचा दाखला.

२) अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आवश्यक.

कोण अर्ज करू शकते-

राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार आणि परित्यक्त्ता स्त्रिया अर्ज करू शकतात. तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला अर्ज करता येईल.

कोणती कागदपत्रे आवश्यक-

१) महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहेत. मात्र लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

२) दरम्यान, परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

टॅग्स :मुंबईसरकारी योजनामहाराष्ट्र