पुन्हा इंडिगो! मुंबई विमानतळावर प्रवासी धावपट्टीजवळ बसून जेवले; कालच हल्ल्याची घटना घडलेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 08:35 IST2024-01-16T08:34:34+5:302024-01-16T08:35:08+5:30
उत्तर भारतात दाट धुके आहे, यामुळे विमानसेवा प्रभावित झालेली आहे. १४ जानेवारीला गोव्याहून दिल्लीला जाणारे विमान मुंबईला वळविण्यात आले होते.

पुन्हा इंडिगो! मुंबई विमानतळावर प्रवासी धावपट्टीजवळ बसून जेवले; कालच हल्ल्याची घटना घडलेली
एअर इंडियानंतर सर्वाधिक वेळा ढिसाळ कारभाराच्या तक्रारी येत असलेली विमानसेवा गो इंडिगोची ठरू लागली आहे. क्रू मेंबर १० मिनिटांत येईल म्हणून प्रवाशांना दी़ड तास विमानातच बसवून ठेवणाऱ्या इंडिगोवर प्रवाशांचा रोष ओढवू लागला आहे. सोमवारी दाट धुक्यामुळे तासंतास बसवून ठेवणाऱ्या इंडिगोच्या वैमानिकावर एका प्रवाशाने हल्ला केला होता. आता मुंबई विमानतळावरून आणखी एक व्हिडीओ समोर येत आहे.
उत्तर भारतात दाट धुके आहे, यामुळे विमानसेवा प्रभावित झालेली आहे. १४ जानेवारीला गोव्याहून दिल्लीला जाणारे विमान मुंबईला वळविण्यात आले होते. यामुळे प्रवाशांचा संयम संपला आणि त्यांनी विमानतळाच्या टरमॅकवरच बसकन मारली. तिथेच त्यांना जेवण, पाणी आदी देण्यात आले.
याचा व्हिडीओ व्हायरल होताच इंडिगोने माफी मागितली आहे. तसेच असे प्रकार भविष्यात न होण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील असे म्हटले आहे.
धावपट्टीवर बसलेल्या प्रवाशांचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. प्रवाशांनी दावा केला की 14 जानेवारी रोजी दिल्ली इंडिगो फ्लाइटला सुमारे 18 तास उशीर झाला आणि त्यानंतर ते विमान मुंबईकडे वळवण्यात आले. उशीर झाल्यामुळे निराश होऊन, फ्लाइट 6e2195 च्या प्रवाशांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि इंडिगो विमानाच्या शेजारी बसून जेवण केले.
या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानेही आपले निवेदन जारी करून पुढील कारवाई होईपर्यंत प्रवाशांना एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांच्या कडक निगराणीखाली आणि सुरक्षेखाली ठेवण्यात आले होते असे म्हटले आहे.