Join us  

एकनाथ शिंदे-अजित पवारांमध्ये रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर खलबतं; बैठकीची INSIDE STORY समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 8:28 AM

जागावाटप आणि सरकारच्या योजनांवरून मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकमेकांवरच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या.

CM Eknath Shinde Ajit Pawar Meeting ( Marathi News ) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत हेदेखील उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत अंतर्गत संघर्ष होत असल्याची चर्चा रंगत असतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या रणनीतीवर कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा अजित पवार हे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्र्‍यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली. महायुतीचे जागावाटप आणि सरकारच्या योजनांवरून मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकमेकांवरच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. परिणामी जनतेत चुकीचा संदेश जात असून याचा निवडणुकीत महायुतीला फटका बसू शकतो. त्यामुळे समन्वय साधण्याच्या दृष्टीने कालची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरही काल वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत चर्चा झाली. ही योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करायला हवे, या योजनेचा प्रसार करत असताना समन्वय कसा असला पाहिजे, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांमध्ये खलबते झाली.

अजित पवारांनी मुख्यमंत्रि‍पदावर दावा केल्याची चर्चा आणि स्पष्टीकरण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत सोमवारी मुंबईत झालेल्या चर्चेत विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केल्याची चर्चा मंगळवारी राजकीय वर्तुळात होती.विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात बिहार पॅटर्न राबवला जावा आणि मला मुख्यमंत्रिपद द्या, अशी मागणी अजित पवारांनी अमित शाह यांच्याकडे केल्याची चर्चा आहे. मात्र, यामध्ये कसलेही तथ्य नाही, तशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मी अमित शाह यांच्याशी कापूस, सोयाबीन आणि कांदा उत्पादकांसह इतर प्रश्नांवर चर्चा केली. यापुढे कांद्याची निर्यातबंदी होऊ नये, अशी विनंती केल्याचा खुलासा नंतर अजित पवारांकडून करण्यात आला आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेअजित पवारमहायुतीशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस