Join us  

'फक्त मंडपाचा खर्च २.२ कोटी...; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावरून जयंत पाटील संतापले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 9:14 PM

शिंदे-फडणवीस सरकार राज्यभरात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेत आहे.

शिंदे-फडणवीस सरकार राज्यभरात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेत आहे. प्रत्येक जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमावरुन आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करत आरोप केले आहेत. " शासन आपल्या दारीच्या एका कार्यक्रमासाठी फक्त मंडपाचा खर्च हा जवळपास २.२ कोटी इतका असल्याचे एक टेंडर माझ्या पाहण्यात आले. सरकारने सरळसरळ लोकांच्या पैशांची उधळपट्टी लावली आहे, असा आरोप पाटील यांनी ट्विटमध्ये केला आहे. 

भाजप मुख्यालयात PM मोदींचे जंगी स्वागत; G20 च्या यशस्वी आयोजनामुळे अभिनंदनाचा वर्षाव

जयंत पाटील म्हणाले, स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम करायचे. भीती घालून सक्तीने लोकं जमवायची. शासकीय यंत्रणा, अधिकारी वर्ग यांना कामाला जुंपायचे. विरोधकांवर त्या मंचावरून टीका करायची. स्वतःचा उदोउदो करायचा हा नवीन उद्योग सुरू केला आहे. 

"एकीकडे शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे, राज्यातील काही भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे, पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागत नाही आणि दुसरीकडे पैशांची अशी उधळण सुरू आहे. "बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं" अशाने प्रश्न सुटत नसतात, असा टोलाही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये लगावला आहे. 

शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'शासन आपल्या दारी' असं या योजनेचे नाव आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत अहमदनगर, कोल्हापूर, जेजुरी, पाचोरा अशा अनेक ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. आता हाच उपक्रम विरोधकांच्या निशाण्यावर आला आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत परळी येथील कार्यक्रमाचा हिशोब ट्विटमध्ये दिला आहे. यावरुन त्यांनी सरकारवर टीका करत आरोप केले आहेत. 

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसबीडधनंजय मुंडे