Join us  

Jitendra Awhad: आमदारांची घरे मोफत नसून एवढी किंमत आकारणार, आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:04 PM

मुंबईत आमदारांसाठी आमदार निवास असताना घरं कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झोपडपट्टी पुनर्विकास, बीडीडी चाळ, पत्रा चाळ यांचा उल्लेख करताना आमदारांसाठीहीमुंबईत हक्काचं घर असणार असल्याचं सांगितलं. सर्वसामान्य लोकांचं झालं, आता लोकप्रतिनीधींचं काय? तर आपण जवळपास 300 आमदारांसाठी मुंबईत घरे देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. या घोषणेचं सभागृहातील आमदारांनी बाक वाजवून स्वागत केलं. मात्र, मनसेसह अनेकानी या निर्णयाला विरोध केला आहे. यावर आता गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

मुंबईत आमदारांसाठी आमदार निवास असताना घरं कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे. तर, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. तर, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही हा खर्च कुणाच्या सांगण्यावरुन, असा सवाल विचारला आहे. एकूणच आमदारांच्या घरांसाठी घेण्यात आलेल्या निर्णयावरुन गोंधळ उडाला असून सर्वसामान्यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. त्यानंतर, आता गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिलं आहे. 

''आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय.मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे.'', असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड यांनी आमदारांच्या घरावरुन होणाऱ्या टिकेनंतर हे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे, आता 70 लाखांत आमदारांना घर मिळणार यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहावे लागणार आहे. 

आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रकार

''नेमकं सरकारला साध्य काय करायचंय? की तुमचं सरकार डळमळीत होतंय, म्हणून आमदारांना आमिष दाखवण्याचा हा प्रकार आहे? मुळात या प्रकाराची गरज काय? जनतेच्या पैशाच्या जीवावर मजा लुटणारे तुम्ही कोण? यासाठी सरकारने सार्वमत घेऊन लोकांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. त्यानंतरच यावर निर्णय घ्यावा. जनता सूज्ञ आहे. जनता नक्कीच याला विरोध करेल'', असेही देशपांडे यांनी म्हटले आहे. 

मोफत घरांपेक्षा 200 युनिट वीज मोफत द्या

मनसेच्या आमदाराने ठाकरे सरकारला (Thackeray Government) 'कामाचा' सल्ला दिला आहे. राजू पाटील (MNS Raju Patil) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आमदारांना मोफत घरे कशासाठी?" असं म्हणत निशाणा साधला. "आमदारांना मोफत घरे कशासाठी? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट मोफत वीज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा" असं राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :मुंबईमुख्यमंत्रीआमदारजितेंद्र आव्हाड