Join us

Jitendra Awhad: "राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल राव"; चक्क गृहनिर्माणमंत्रीच म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 9:40 AM

राज्यातील कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आली असून राज्य सरकार आणि गृहखात अपयशी झाल्याचा आरोप राणा दाम्पत्याने केला होता

मुंबई - राणा दाम्पत्यांनी हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्टच धरल्यानंतर शिवसेना विरुद्ध राणा असा वाद राज्यात चांगलाच रंगला. त्यानंतर, सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यास अटक करण्यात आली. अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यावरुन, देशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज असल्याचं मत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आली असून राज्य सरकार आणि गृहखात अपयशी झाल्याचा आरोप राणा दाम्पत्याने केला होता. त्यानंतर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही राणा दाम्पत्याने नौटंकी बंद करावी, त्यांच्या आंदोलनामागे कोणाची तरी हात असून सुपारी घेऊन हे करण्यात येत असल्याचं संशयही वळसे पाटील यांनी व्यक्त केला होता. तसेच, राज्यात अस्थिरता दाखवत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा हा डाव असल्याचेही त्यांनी म्हटल होते. भाजप नेत्यांकडूनही राष्ट्रपती राजवटीवर भाष्य करण्यात येत आहेत. त्यावरुनच, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन राष्ट्रपती राजवटीवर भाष्य केलंय.  राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल, असे ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटवरुन त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे. नेटीझन्सने ट्विटरवर रिप्लायमध्ये, एवढ्यातच का...? तुम्हीही महाविकास आघाडीला वैतागले का? असे सवाल केले आहेत. 

काय म्हणाले नारायण राणे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षम नाही. राज्याचे प्रश्न त्यांना माहिती नाही. ८९ हजार कोटींचा तूट आहे. राज्याची व्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. तसेच एका व्यक्तीला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा कायदा, असा प्रकार राज्यात सुरु आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला मागे नेल्याची टीका देखील नारायण राणे यांनी केली आहे. पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड उगवण्याचे काम करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नाही. खून होत आहेत. दरोडे पडताय, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट येणे गरजेचं आहे, असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. 

राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न - गृहमंत्री

सध्याच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केली आहे. कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी योग्य पावलं उचलण्याच्या सूचना त्यांनी केल्या असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असल्याचं भासवण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पुढे करण्यात आलेलं एक प्यादं आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवून सरकार अस्थिर करून राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडमुंबईअमित शाहभाजपा