Join us  

पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्याच झाली; गृहमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 5:40 AM

रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या वाहनाचा जाणीवपूर्वक अपघात घडवून त्यांची हत्या करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या वाहनाचा जाणीवपूर्वक अपघात घडवून त्यांची हत्या करण्यात आली. हा कट पूर्वनियोजित होता का आणि इतर गोष्टी तपासण्यासाठी पोलिस उपअधीक्षकांच्या अधिपत्याखाली एसआयटी चौकशी सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी लेखी उत्तरात दिली. 

रत्नागिरीतील राजापूर तालुक्यामध्ये ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाविरोधात पत्रकार शशिकांत वारिशे यांनी महानगरी टाईम्स या वर्तमानपत्रात आरोपीविरूद्ध बातमी प्रकाशित केली होती. त्या गोष्टीचा राग मनात ठेवून नाणार परिसरात ६ फेब्रुवारीला वारिशे यांच्या दुचाकीला पाठीमागू्न जाणीवपूर्वक धडक देत हत्या घडवून आणली, अशी कबुली आरोपीने दिली आहे. त्यानंतर पुरवणी आरोपपत्र दाखल करून आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण हत्या प्रकरणाचा तपास ११ फेब्रुवारीपासून एसआयटीकडून करण्यात येत असून, त्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती गृहमंत्री फडणवीस यांनी लेखी स्वरुपात सभागृहात सादर केली. 

पत्रकार वारिशे हत्या प्रकरणात अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, सतीश चव्हाण, सचिन अहिर, सुनील शिंदे, विलास पोतनीस, विक्रम काळे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :देवेंद्र फडणवीस