Join us  

कोस्टल रोडवरून हाजी अलीपासून वरळी -वांद्रे सीलिंकपर्यंतचा प्रवास सुसाट

By जयंत होवाळ | Published: July 10, 2024 6:18 PM

रात्री ११ वाजेपर्यंत या मार्गावरून प्रवास करता येईल. शनिवारी आणि रविवारी वाहिनी बंद असेल.

मुंबई: कोस्टल रोड प्रकल्पातील उत्तर वाहिनी मार्गावर हाजी अलीपासून पुढे खान अब्दुल गफार खान रस्त्यामार्गे वरळी -वांद्रे सीलिंकपर्यंतचा प्रवास उद्यापासून मुंबईकरांना करता येणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून ही वाहिनी वाहनांसाठी खुली केली जाणार आहे. रात्री ११ वाजेपर्यंत या मार्गावरून प्रवास करता येईल. शनिवारी आणि रविवारी वाहिनी बंद असेल.

एकूण कोस्टल रोडचे ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सीलिंकच्या वरळी टोकापर्यंत कोस्टल रोड बांधला जात आहे. या मार्गाचा काही भाग यापूर्वीच टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने लोकार्पण करण्यात आले होते. या प्रकल्पातील बिंदू माधव चौक ते मारिन ड्राइव्ह ही दक्षिण वाहिनी मार्गिका ११ मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. तर मरिन ड्राइव्ह ते हाजी अली मार्गे लोटस जंक्शनपर्यंत उत्तर दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे १० जून रोजी लोकार्पण करण्यात आले होते.

आता हाजी अली ते खान अब्दुल गफार खान पर्यंतच्या उत्तर दिशेने जाणाऱ्या सुमारे ३.५ किमी मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून ही मार्गिका ११ जुलैपासून सुरु केली जाणार आहे. या मार्गिकेवरून फक्त सीलिंकला जाता येईल. वरळी आणि प्रभादेवी परिसरात जाण्यासाठी डॉ.बेझंट मार्ग व खान अब्दुल गफार खान मार्ग या नेहमीच्या रस्त्यांचा वापर करण्यात यावा , अशी सूचना पालिकेने केली आहे. एकार्थाने मरीन ड्राइव्ह पासून कोस्टल रोडमार्गे खान अब्दुल गफार खान मार्गावरून फक्त सीलिंकला जाता येईल. तसेच लोटस जंक्शनवरून सीलिंकला जाण्यासाठी आंतरबदलातील एक मार्गिका ( आर्म ८ ) सुरु करण्यात येत आहे.

कोस्टल रोडची वैशिष्ट्ये

रस्त्याची लांबी १०.५८ किमी

मार्गिकांची संख्या प्रत्येकी ४ याप्रमाणे ८ मार्गिका

बोगद्यात प्रत्येकी तीन मार्गिका

भराव टाकून बनवलेल्या रस्त्याची लांबी ४.३५ किमी

पुलांची एकूण लांबी २.१९ किमी

बोगदे- दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकीं २.०७ किमी

पहिला बोगदा जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण

दुसरा बोगदा मे २०२३ मध्ये पूर्ण

भूमिगत वाहनतळ ४, एकूण वाहनसंख्या १८००

आंतरबदल ३नवीन पदपथ ७. किमीबससाठी स्वतंत्र मार्गिकासागरी तटरक्षक भिंत ७.४७ किमीतटरक्षक भिंतीमुळे सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून संरक्षणकोस्टल रोडमुळे ७० टक्के वेळेची, बचत ३४ टक्के इंधनाची बचत७० हेक्टर हरितक्षेत्र निर्माण झाल्यामुळे प्रदूषण कमीहाजी अली व महालक्ष्मी मंदिर या धार्मिक स्थळांजवळ तसेच वरळी येथे पार्किंगची सुविधाहरितक्षेत्रात सायकल ट्रॅक , सार्वजनिक उद्याने, खुले प्रेक्षागृह

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई