Join us

"जसं आज २१ जून सर्वात मोठा दिवस, तसाच राष्ट्रवादी पक्ष आगामी काळात ठरणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 6:15 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून दहा वर्षे केंद्रात आणि साडे सतरा वर्षे राज्यात सत्तेत राहिला आहे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन १० जूनला होता, त्यानिमित्त अहमदनगर येथे मोठा कार्यक्रम आयोजित केला असताना नियतीच्या मनात काही वेगळे होते. १० जूनचा कार्यक्रम आज २१ जून रोजी आयोजित करण्याचा निर्णय झाला. वर्षभरातील सर्वात मोठा दिवस हा २१ जून आहे. या दिवशी आपण रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. जसा हा दिवस मोठा आहे त्याप्रमाणेच येणाऱ्या काळात सर्वात मोठा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरणार आहे, असा विश्वास माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या रौप्य महोत्सवी वर्षात व्यक्त केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून दहा वर्षे केंद्रात आणि साडे सतरा वर्षे राज्यात सत्तेत राहिला आहे. याकाळात जे नेते घडले ते केवळ आदरणीय शरद पवार साहेबांमुळे घडले. पक्षाची स्थापना झाली तेव्हा राज्याची जबाबदारी भुजबळ साहेब तर केंद्राची जबाबदारी पवार साहेब संभाळत होते. पुढे स्व. आर. आर. पाटील, अरूणभाई गुजराथी, सुनील तटकरे, जयंतराव पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. आदरणीय अजितदादांनी देखील भावाप्रमाणे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळल्याचे मुंडे यांनी म्हटले.  

महाराष्ट्रात तरूणांचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या पक्षात तरूणांना मोठी संधी आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून याचा मला अभिमान वाटतो. ज्या ज्या वेळी पवार साहेबांचे समाजकारण आणि राजकारण पाहायला मिळते तेव्हा पवार साहेब हे सर्व क्षेत्रातील विश्व विद्यापीठ आहेत याची प्रचिती येते. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे स्वराज्य होते. त्या रयतेच्या राजाला अभिप्रेत असणारे समाजकारण आणि राजकारण करणे सोपे नाही. पण, पवार साहेबांनी महिलांना, सर्व घटकांना सन्मान दिला आहे. देशात सर्वप्रथम मंडल आयोग पवार साहेबांनी स्वीकारला. आम्ही कधी मंत्री होऊ अशी महत्त्वाकांक्षा ठेवली नाही. मात्र ही संधी शरद पवारांनी आम्हाला दिली. 

न्यूज अरेना भाजपचा सर्व्हे

आपल्यासमोर हजार संकटे आहेत. सध्या सोशल मीडियावर न्यूज अरेना इंडियाचे सर्वेक्षण चर्चेत आहे. न्यूज अरेना इंडिया हे भारतीय जनता पक्षाचे असून त्यामार्फत पायात साप सोडण्याचे काम होत आहे. या सर्वेक्षणात काही तथ्य नाही, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले. 

राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल

आज जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. सत्ताधाऱ्यांना खरच हिंदुत्वाचा कळवळा आहे का? नऊशे वर्ष मुघलांची सत्ता असतानाही हिंदू धर्म देशात टिकून राहिला आणि वाढला. त्याकाळात कोणालाही हिंदू धर्म रक्षणासाठी मोर्चे काढावे लागले नाहीत. आज मात्र दहा वर्षे हिंदू हित की बात करेगा, वही देश मे राज करेगा असे म्हणणारे सत्तेत असतानाही हिंदूंना स्वत:चे रक्षण करण्यासाठी मोर्चे काढावे लागत असतील तर या देशात नेमके कोण सुरक्षित आहे, याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. आज वर्धापन दिन कार्यक्रमाच्या दिवशी आपण शपथ घेऊ की येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा पक्ष करून आपला मुख्यमंत्री राज्यात बसलेला असेल, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

टॅग्स :धनंजय मुंडेराष्ट्रवादी काँग्रेसमुख्यमंत्रीशरद पवार