Join us  

दिवाळीची तूरडाळ आताच घेऊन ठेवा, २०० रुपयांवर जाणार! सणासुदीत वरण-भात खाताना विचार करावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 4:09 PM

महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे बजेट कोलमडले जात आहे. त्यात आर्थिक संकटाची भर पडली आहे.

मुंबई :

महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे बजेट कोलमडले जात आहे. त्यात आर्थिक संकटाची भर पडली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत वरण, आमटीला चव देणाऱ्या तूर डाळीचे दर सध्या १८० रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. दरम्यान, आणखी २ ते ३ महिने तरी हे दर कमी न होता, उलट २०० रुपये प्रति किलोपर्यंत  पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत किचनचे बजेट सांभाळायचे कसे, हा मोठा प्रश्न गृहिणींपुढे उभा आहे. आपल्याकडे तुरीची डाळ विशेषतः वरण-भात सणासुदीच्या दिवसांत ही आवडीने खाल्ली जाते. त्यामुळे तूर डाळीची मागणी नेहमीच वाढत राहते मात्र यंदा एकीकडे डाळीच्या उत्पादनातच घट झाली असताना दुसरीकडे मात्र त्याचवेळी मागणी वाढली. त्यामुळे तूर डाळीचे दर गगनाला भिडल्याचे चित्र आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांत तूर डाळीच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत तूर डाळ घाऊक बाजारात भाव ९० रुपये किलोपर्यंत होते. 

मार्चमध्ये दर १०५ रुपये अन् एप्रिलमध्ये ११२ रुपये किलोपर्यंत गेले. आता काही ठिकाणी हेच दर १७० ते १८० रुपये प्रती किलोपर्यंत पोहचले आहेत. इतर बाजारांबरोबरच मुंबईच्या बाजारातही तुरीची आवक घटली आहे. 

सध्यातरी ऑक्टोबरपर्यंत दर तेजीत राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भारतात म्यानमार, सुदान आणि दक्षिण आफ्रिकेतून तुरीची आयात होते. सरकारने आयात शुल्क हटवून आयात खुली केली, तरीही पुरेशी आयात झाली नाही. सुदानमधूनही आयात थंडावली आहे.

तूर डाळ ही डिसेंबरपासून बाजारपेठेत येते. गतवर्षी कमी उत्पादन झाले असले तरी मराठवाडा, खानदेशातील शेतकरी येणाऱ्या काळात जर जास्त उत्पादन घेतले तर दर कमी होऊ शकतात. सध्या मागणी जास्त आणि आवक कमी झालेली पाहायला मिळते.- श्रीनिवास मिठारी, होलसेल अँड रिटेलर व्यापारी  

आयात घटल्याने दरात वाढ    मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीत अवकाळी पावसाने डाळींची आवक घटल्याने डाळींची दरवाढ झालेली आहे.  गुजरात आणि महाराष्ट्रातून दाखल होणाऱ्या डाळींच्या उत्पादनाला पावसाचा फटका बसला आहे.

 एपीएमसीत आवक घटली, परिणामी एपीएमसीत तूर डाळ, उडीद डाळींची शंभरी पार तर मूग डाळीच्या दरात ३ टक्के वाढ झाली आहे.  एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून डाळी दाखल होतात, परंतु राज्यातून आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर डाळींची आवक होते.  पावसामुळे उत्पादनाला फटका बसला आहे. तसेच डाळींची आयात देखील होत नाही.

अन्य डाळींचे दर (प्रतिकिलो रुपये)चणाडाळ १०० रुपये किलोमूगडाळ- १५० उडीद डाळ- १७०मसूर डाळ- १३०

बाजारात डाळींची आवक घटली आहे. फेब्रुवारीपासून डाळींची दरवाढ होण्यास सुरुवात झाली असून आता पुन्हा डाळींचे दर कडाडले आहेत.