Join us

नवाब मलिकांना मंत्रिपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान; भाजपाचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 3:55 PM

गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्मिता दुखावणाऱ्या कारवायांना सातत्याने प्रोत्साहनच दिले असा आरोप भाजपाने केला.

मुंबई - तुरुंगाच्या कोठडीतून मंत्रिपदाचा कारभार पाहणाऱ्या नवाब मलिक(Nawab Malik) यांच्यावर पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले आहे तसेच सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. असे असताना त्यांना मंत्रिमंडळात ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. आता तरी मुख्यमंत्र्यांनी मलिक यांची हकालपट्टी करून महाराष्ट्राचा अपमान थांबवावा अशी जोरदार टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये(BJP Keshav Upadhye) यांनी शुक्रवारी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपाध्ये म्हणाले की, बेनामी मालमत्तांच्या व्यवहारातून गोळा केलेला पैसा दाऊदच्या दहशतवादी कारवायांना पुरविण्याचा आरोप असलेल्या मलिक यांची तुरुंगात राहून सर्वाधिक काळ बिनखात्याचे मंत्री म्हणून नवा विक्रम केला आहे. खरे तर मलिक यांना अटक झाल्या झाल्या त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी होती. एरवी महाराष्ट्राच्या अस्मितेची भाषा वारंवार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध ठेवणाऱ्या मलिक यांची पाठराखण करताना महाराष्ट्राचा अपमान होतो आहे  याची जाणीव नसावी हे दुर्दैवी आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्मिता दुखावणाऱ्या कारवायांना सातत्याने प्रोत्साहनच दिले असून नवाब मलिक यांना तर त्यांनी चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्रकही देऊन टाकले होते. शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणातील सचिन वाझे हा काही लादेन नाही अशा शब्दांत त्याची प्रशंसाही केली होती. केंद्रीय मंत्री राणे यांच्या घरावर चाल करून जाणाऱ्यांच्या सत्कारास प्रोत्साहन देऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनोवृत्तीचे दर्शन महाराष्ट्रास घडविले होते सातत्याने आपली खुर्ची जपण्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

नवाब मलिक यांच्यावर ईडीने अंडरवर्ल्डशी संबंध आणि टेरर फंडिंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याकडून एक जमीन अवैध मार्गाने एका पैशाच्या मोबदल्यात खरेदी केली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या तपासात हसिना पारकरचा मुंबईतील कुर्ला परिसरातील गोवा वाला कंपाऊंडमधील सुमारे ३ एकर जमिनीवर डोळा असल्याचे आढळून आले. या जमिनीची मालकी मुनिरा प्लंबर नावाच्या महिलेकडे असली तरी तिने या जमिनीवर स्थायिक झालेल्या भाडेकरूंकडून पैसे वसूल केले आणि इतर कामांसाठी या जमिनीचा पॉवर ऑफ अॅटर्नी दाऊद इब्राहिमचा खास गुंड होता आणि १९९३ मध्ये मुंबईतील स्फोटातील दोषी सरदार वली शाह खान याला देण्यात आले होते. मात्र, हसीना पारकर, सरदार वली शाह खान आणि सलीम पटेल नावाच्या आणखी एका व्यक्तीने या जमिनीसाठी खोटे मुखत्यारपत्र तर मिळवलेच, शिवाय ही जमीन राष्ट्रवादीचे नेते नवाब यांना विकली.

टॅग्स :नवाब मलिकभाजपा