Join us

एक माथेफिरू ओठाखाली टोमॅटो सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतोय; संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 10:09 AM

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावर काल दिल्लीवारी केली आणि केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन ठाकरे सरकारची तक्रार केली.

मुंबई- 

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावर काल दिल्लीवारी केली आणि केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन ठाकरे सरकारची तक्रार केली. यामुद्द्यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "एक माथेफिरू सध्या ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करत जगभर फिरत असेल तर अशा व्यक्तीच्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे", असा खोचक टोला संजय राऊत यांनी सोमय्यांना लगावला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

संजय राऊत यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्यात लोकशाहीला पायदळी तुडवलं जात असल्याच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. "ज्या पक्षाचं नेतृत्त्व नरेंद्र मोदी करत आहेत अशा भाजपाच्या राज्यातील नेत्यांकडून लोकशाहीची प्रवचनं झोडली जात असतील तर त्यांचं कौतुकच आहे. त्यांना जी लोकशाहीची उबळ आली आहे. ती उत्तर प्रदेशच्या बाबतीतही कायम असावी. मी कालही सांगितलं यूपीत तीन महिन्यात १७ हून अधिक बलात्काराची प्रकरणं घडली आहेत आणि हत्याही झाल्यात. त्यामुळे फडणवीसांनी याबाबतही मन मोकळं करावं आणि लोकशाहीवर बोलावं", असं संजय राऊत म्हणाले. 

'शरद पवार बरोबर बोलले'संजय राऊत यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांबाबत केलेल्या विधानाचा दाखला देखील दिला. "शरद पवारांनी खूप चांगलं वक्तव्य केलं. सरकार येऊ शकलं नाही म्हणून जी अस्वस्थता निर्माण झाली आहे ती फडणसींच्या लाऊडस्पीकरमधून बाहेर पडत आहे. सत्ता न आल्यानं निर्माण झालेल अस्वस्थता त्यांनी घरात बसून हनुमान चालीसा म्हणून मन शांत करावं", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतकिरीट सोमय्याशिवसेना