मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या इकोफ्रेंडली मेट्रो ३ मार्गामुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार असल्याचा दावा, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.टनलिंग असोसिएशन आॅफ इंडिया, केंद्रीय सिंचन व वीज महामंडळ, मुंबई मेट्रो रेल कॉर्पाेरेशन, इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूट, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पायाभूत सुविधा भुयारीकरणाची आव्हाने या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत भिडे बोलत होत्या.या वेळी त्या म्हणाल्या की, जगभरात उपलब्ध असलेल्या उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणस्नेही मेट्रो प्रकल्प उभारण्याचा आमचा मानस आहे. मुंबईकरांना मेट्रो ३ चा लाभ लवकरात लवकर घेता यावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जबाबदारी घेतली आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या कार्यशाळेमुळे जगभरातील उत्तम तंत्रज्ञानाची माहिती अवगत झाल्याचेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे प्रकल्प संचालक एस.के. गुप्ता म्हणाले की, मेट्रो मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरासाठी वरदान आहे. नियोजन काळात मेट्रो ३ ला कार डेपोच्या जागेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. यावर शासनाने योग्य तोडगा काढला असून कार डेपोसाठी आता कांजूरमार्गचा पर्याय उपलब्ध करून दिला असल्याचेही ते म्हणाले.
मेट्रो ३ इंधनाची होणार मोठ्या प्रमाणात बचत
By admin | Published: November 01, 2015 2:27 AM