Join us

जलवाहिनीला गळती; ४ विभागांत पाणी नाही, दुरुस्ती २४ तासांत पूर्ण करण्याचे पाणीपुरवठा विभागाचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:00 IST

Mumbai News: पवई येथे जोगेश्वरी - विक्रोळी जोड रस्ता पुलाजवळ १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा जलवाहिनीला मंगळवारी पहाटे  मोठी गळती लागली. यामुळे तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे.

 मुंबई - पवई येथे जोगेश्वरी - विक्रोळी जोड रस्ता पुलाजवळ १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा जलवाहिनीला मंगळवारी पहाटे  मोठी गळती लागली. यामुळे तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ‘एस’ विभाग, ‘के’ पूर्व विभाग, ‘जी’ उत्तर विभाग आणि ‘एच’ पूर्व विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पवई ते धारावी दरम्यानची जलवाहिनी बंद करण्यात आली आहे. या दुरुस्ती करिता २४ तासांचा कालावधी अपेक्षित आहे. गळती आढळून आल्याने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी झडपा (व्हॉल्व्ह) तातडीने बंद करण्यात आल्या. गळती रोखून दुरुस्ती करण्याचे काम जल अभियंता खात्याद्वारे युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. लवकरच काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दुरूस्ती अंतर्गत मुख्य जलवाहिन्यांचे पृथक्करण पवई ते मरोशी पर्यंत घेण्यात येणार आहे. 

बाधित होणारे परिसर‘एस’ विभाग - गौतमनगर निम्न पातळी, जयभीमनगर, बेस्टनगर, फिल्टर पाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजीनगर, आरे रस्ता, मिलिंदनगर, एल ॲण्ड टी परिसर. ‘के’ पूर्व विभाग - ओमनगर, साहारगाव, जे. बी. नगर, लेलेवाडी, मरोळ जलवाहिनी, कदमवाडी, शिवाजीनगर, सेव्हन हिल्स रूग्णालय परिसर, चिमटपाडा, टाकपाडा, सागबाग, तरुण भारत, चकाला, कबीरनगर, बामणवाडा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसर.जी उत्तर - धारावी. एच पूर्व - बेहरामपाडा, वांद्रे रेल्वे टर्मिनस. 

 १४५० मिलीमीटर  व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने पवई ते धारावी दरम्यानची जलवाहिनी बंद करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :मुंबई