Join us  

"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 10:37 AM

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता आज होत आहे. त्याआधी इंडिया आघाडीनं पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला.

मुंबई - Congress on BJP ( Marathi News ) केवळ महाराष्ट्रात नाही तर मणिपूर, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेशात फोडाफोडी करून राज्य स्थापन केले होते. त्याविरोधात आम्ही आघाडीचे लोक लढतोय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे. ४८ पैकी कमीत कमी ४६ जागा जिंकू असं वातावरण आहे. त्यांना शून्य जागा मिळतील असं मी बोलत नाही. काही ना काही त्यांना मिळेल परंतु आमची आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपाला हरवेल असा मोठा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. 

मुंबईत इंडिया आघाडीची पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकार विश्वासाघातातून बनवलं, त्याचे समर्थन पंतप्रधान करतात. त्यामुळे राज्यात अनेक रॅली त्यांनी घेतली. समाजात दुही माजवण्याची भाषा पंतप्रधान करतात. चुकीच्या पद्धतीने आपले विचार मांडून लोकांना भडकवण्याचं काम आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने केले नसेल. मी ५३ वर्ष राजकारणात आहे. विश्वासघाताचं राजकारण सुरू असून मोदी सरकार संविधानाचा गैरवापर करत आहे. धमकी, लालच देऊन विरोधी पक्षात फूट पाडली जाते. त्यात जे खरे पक्ष आहेत त्यांच्याकडून पक्ष काढून, चिन्ह काढून भाजपाचं समर्थन करणाऱ्या गटाकडे ते सोपवलं गेले. सर्व गोष्टी मोदींच्या इशाऱ्यावर चालतात. परंतु यावेळी जनता ही लढाई लढत आहे. या लढाईत जनता विजयी होईल आणि या लोकांच्या करारनाम्यावर ते नाराज आहेत. लोकशाहीची भाषा ते करतात परंतु लोकशाहीवर चालत नाही. गेली २ वर्ष महापालिका निवडणुका झाल्या नाहीत ही मोदींची लोकशाही आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच  आम्ही निवडणुकीत लोकांना काही गॅरंटी दिली आहे. इंडिया आघाडीसोबत आम्ही आश्वासने दिली आहेत. रिक्त जागा भरणे, युवकांना रोजगार, मनरेगा अंतर्गत शहरातील लोकांनाही कामे देणे. युवकांना १ लाख रुपये अनुदान देणे, महिलांना महालक्ष्मी योजनेतून १ लाख रुपये वार्षिक देणार आहोत. २५ लाखांचा आरोग्य विमा, विद्यार्थ्याचे कर्ज माफ करणार , शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, कृषी साहित्यावरील जीएसटी हटवू. भाजपानं जी आश्वासने दिली ती पूर्ण केली नाही. आमचं सरकार आल्यास एकच दर असलेला जीएसटी सगळ्यांना लागू करू. आज आघाडीकडे लोकांचा कल आहे. आघाडी यंदा सत्ता येते, भाजपाला काही मिळणार नाही. आम्ही लोकांना १० किलो धान्य मोफत देऊ असं खरगेंनी सांगितले. 

दरम्यान, ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा दुरुपयोग भाजपाकडून केला जातोय. त्यामुळे संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी आघाडीचं सरकार येणं गरजेचे आहे. जनतेला जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी पारदर्शक सरकार आम्ही आणणार. आघाडी सरकार येणार आहे त्यामुळे आता धमक्या यापुढे चालणार नाही असा टोलाही काँग्रेस अध्यक्षांनी भाजपाला लगावला. 

टॅग्स :मल्लिकार्जुन खर्गेकाँग्रेसइंडिया आघाडीलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणुक रणांगण २०२४