Join us

मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी

By प्रविण मरगळे | Published: October 26, 2024 5:36 PM

मुंबईतील १९ जागांवर ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. त्यात वर्सोवा मतदारसंघात ठाकरेंनी हरुन खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला मुंबईत धक्का बसणार आहे. वर्सोवा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत कुणाच्या वाट्याला जाणार अशी चर्चा सुरू होती. अखेर हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आला. परंतु तिथे अनपेक्षितपणे ठाकरे गटाने हरुन खान यांना उमेदवारी दिली त्यामुळे येथील इच्छुक राजू पेडणेकर आणि राजूल पटेल नाराज झाले आहेत. पक्षाने अन्याय केला अशी खंत व्यक्त करत हे दोघेही अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. 

याबाबत लोकमत ऑनलाईनशी राजूल पटेल यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, वर्सोव्यातून हरुन खान यांना उमेदवारी दिल्याने मी नाराज आहे. तिकिट देताना काय निकष पाहिले माहिती नाही. मला जेव्हा शिवसेना-भाजपा ऑफर देत होते तेव्हा मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिले. वेळ पडल्यास मी अपक्ष निवडणुकीत उभं राहणार आहे. मागील निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून मी ३२८०० मते घेतली होती. जे आमदार झाले त्यांना ३६ हजार आणि मला ३२ हजार मतदान झाले होते. मी दुसऱ्या क्रमांकावर होते. युतीत ही जागा भाजपाला गेली होती म्हणून मी अपक्ष निवडणूक लढले होते असं त्यांनी सांगितले. तसेच २०१४ साली माझा अर्ज बाद झाला होता, त्यामुळे गेल्या निवडणुकीत मी अपक्ष निवडणूक लढवून पक्षाचं नुकसान भरून देईन असं वाटलं होते. परंतु यावेळी संधी मिळेल अशी अपेक्षा होती असंही राजूल पटेल यांनी खंत व्यक्त केली. 

तर ३५ वर्षाची अहोरात्र मेहनत, त्याग, पक्षनिष्ठा, संघटने प्रति समर्पण, केसेस, समाजकार्य या बदल्यात सततचा होणारा अन्याय! २००४,२००९,२०१४,२०१९! आता २०२४ ला या सर्वाचा न्याय निवाडा माझ्या वर्सोवा विधानसभेतील माझ्या जिवाभावाचे शिवसैनिक, कार्यकर्ते, व सर्व सामान्य जनता नक्कीच करेल ही त्यांच्याकडून अपेक्षा. मी या अन्याय विरुद्ध लढत आहे. तीन दशकाच्या माझ्या राजकीय सामाजिक जीवनाच्या प्रवासात कधीतरी हा छोटासा कार्यकर्ता  तुमचा राजू तुम्हाला उपयोगी पडला असेल तर मला नक्की बळ द्या! अन्यायाविरुद्धच्या या लढाईत सामील व्हा,आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असं आवाहन वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे दुसरे इच्छुक राजू पेडणेकर यांनी जनतेला केले आहे. त्यामुळे राजू पेडणेकर हेदेखील या निवडणुकीत अपक्ष उतरण्याची तयारी करत आहेत.

कोण आहेत राजू पेडणेकर, राजूल पटेल?

राजू पेडणेकर हे मुंबई महापालिकेत ३ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेत तर राजूल पटेल यादेखील शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. शिवसेना महिला विभाग संघटक आणि नगरसेविका म्हणून त्यांनी काम केले आहे. विशेष म्हणजे राजूल पटेल यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याची भीष्मप्रतिज्ञा केली होती. २०१२ ते २०१९ पर्यंत त्यांनी ७ वर्ष अनवाणी फिरत पक्षाचा प्रचार केला होता. २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून राजूल पटेल यांनी ३२ हजार मते घेतली होती. त्यांना यावेळी वर्सोव्यातून तिकिट मिळेल अशी अपेक्षा होती परंतु पक्षाने तिकिट न दिल्याने त्या नाराज झाल्या आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४वर्सोवामुंबई विधानसभा निवडणूकउद्धव ठाकरेमहाविकास आघाडीकाँग्रेस