Join us  

Jayant Patil : 'सोबत असणारे लोकच अजित पवारांवर टीका करतात'; जयंत पाटलांनी डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 2:46 PM

Jayant Patil : 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात काही नव्या योजना आणल्या आहेत, या योजनांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अजित पवार हे राज्यातील जनतेला भावनिक साद घालताना दिसत आहेत. तसेच, या व्हिडिओद्वारे राज्यातील अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांनाही टोला लगावला आहे. यावरुन आता 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना डिवचलं आहे.

"मी कोणताही पक्ष बदललेला नाही, जनता हाच...", अजित पवारांकडून जनतेला भावनिक साद!

जयंत पाटील म्हणाले, "आम्ही अनेक वर्षे सोबत काम केले आहे, आम्ही कधी एखादी गोष्टी स्वत: केली असं सांगितलं नाही. त्यामुळे त्यांचा तो स्वभाव आहे, त्यामुळे त्यांनी व्हिडिओमध्ये तशी भूमिका घेतली.

"मेजॉरीटी आल्यानंतर मुख्यमंत्री होणार, आता महाराष्ट्रातील लोकांचा कल समोर आला आहे. लोकसभेचा कल समोर आला. लोक महाराष्ट्रातील सरकारच्या विरोधातही आहेत. लोक जेवढी एनडीए सरकारविरोधात आहेत त्यापेक्षा जास्त महाराष्ट्र सरकारविरोधात आहेत. त्यामुळे त्यांचे अंतर्गत सर्व्ह ५० , ६० जागांच्या पुढे दाखवत नसतील म्हणून अतिशय टोकाच्या या योजना करण्याचा प्रयत्न केला आहे, असा टोलाही पाटील यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला लगावला.

अजितदादांच्या आसपासचेच विरोधक सापडतील

जयंत पाटील म्हणाले, दादांच्या बरोबर आहेत त्यांनी आयुष्यभर त्यांच्यावर टीका केली आहे. २००३-०४ पासून ते अजितदादांवर टीका करत आहेत. आता अजितदादा काही कारणामुळे, काही अडचणीमुळे त्यांच्या बाजूला जावून बसले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या आसपासचेच विरोधक त्यांना सापडतील.

सगळ्या योजनांना मुख्यमंत्र्यांचे नाव दिले म्हणून हा व्हिडीओ करावा लागला का? यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला हे श्रेय जात असेल म्हणून हा श्रेय वाद असेल, असं जयंत पाटील म्हणाले.

अजित पवारांकडून जनतेला भावनिक साद!

राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो आणि आजही जनतेचाच आहे, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत अजित पवार हे राज्यातील जनतेला भावनिक साद घालताना दिसत आहेत. तसेच, या व्हिडिओद्वारे राज्यातील अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांनाही टोला लगावला आहे.

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाअजित पवार