Join us

Maharashtra Political Crisis: “शिवसेनेत दोन गट असल्याचा दावा नाही, समित्यांची नियुक्ती नियमानुसारच”: राहुल नार्वेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 2:43 PM

Maharashtra Political Crisis: शिवसेना विधिमंडळ एक दिसत आहे. शिवसेनेकडून दोन वेगळे असल्याचा कोणी दावा केलेला नाही, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra Political Crisis:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर लगेचच नव्या शिंदे-भाजप सरकारने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा धक्का दिला आहे. विधानसभेच्या कामकाज सल्लागार मंडळाच्या समितीत शिवसेनेच्या एकाही सदस्याचा समावेश नसल्याचे सांगितले जात होते. यावर आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले आहे. 

शिवसेनेच्या उद्धव गटाचे गटनेते अजय चौधरी यांनी याबाबत अध्यक्षांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. तसेच अनेक प्रश्न उपस्थित करत तक्रारही केली होती. अजय चौधरी यांच्या पत्राबाबत नार्वेकर म्हणाले की, नियमानुसार विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे यांनी ३ जुलै २०२२ ला पत्र दिले. त्यांनी उल्लेख केला गट नेता स्वतः ते आहे. नियमानुसार शिंदे यांचे पत्र ग्राह्य आहे, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. 

माझ्यासमोर कोणी दावा केला नाही की वेगळा गट आहे

माझ्यासमोर कोणी दावा केला नाही की वेगळा गट आहे. त्यामुळे माझ्यासमोर शिवसेना विधिमंडळ एक दिसत आहे. शिवसेनेकडून दोन वेगळे गट आहे असा कोणी दावा केलेला नाही. त्यामुळे दोन वेगवेगळ्या नेत्यांचे कसे ऐकले जाईल. ज्यांना समितीत संधी मिळालेली नाही त्यांनीही दावा केलेला नाही, असे नार्वेकरांनी सांगितले. तसेच जे कामकाज होत आहे ते नियमानुसार होत आहे. समिती नियमानुसारच गठीत झाली आहे, असे राहुल नार्वेकर यांनी नमूद केले आहे. 

दरम्यान, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. विधिमंडळ त्याचे काम करते. विधीमंडळ कामकाजामध्ये न्यायालय हस्तक्षेप करत नाही. न्यायालय विधिमंडळ कामकाजाला स्थगिती देऊ शकत नाही. अजूनही कसली स्थगिती नाही. कोणतंही नियमबाह्य काम केले नाही. गटनेता कोण हे आम्ही ठरवत नाही. गटनेता कोण हे आम्हाला कळवले जाते, असे नार्वेकर म्हणाले.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळराहुल नार्वेकरउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेना