मुंबई : ‘एका वर्षाच्या कार्यकाळात राज्याच्या विकासाला दिशा देताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र सर्व अडचणी दूर करून येत्या पाच वर्षांत महाराष्ट्र बदलणार’, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त बुधवारी लोअर परेल येथे पार पडलेल्या आयबीएन लोकमत आणि एमआयडीसी प्रस्तुत ‘अजेंडा महाराष्ट्र २०१५’ या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.नंदेश उमप यांच्या बहारदार सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या सत्रात मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वर्षभरातील कार्याचा लेखाजोखा मांडला. या वेळी शेती, दुष्काळ, पाण्याचे नियोजन, रोजगार, उद्योग, खेळ, मनोरंजन आणि साहित्यापासून विविध विषयांवर त्या-त्या विषयातील तज्ज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी दिलखुलास उत्तरेही दिली. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर सडकून टीका केली. शिवाय राज्यात एकहाती सत्ता देण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले.तिसऱ्या सत्रात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील रस्ते विकासासोबत उड्डाणपुलाचे जाळे विणण्यासंबंधीची माहिती दिली. वाहतुकीमधील बदलांसह सार्वजनिक वाहतुकीमध्ये भविष्यात होणाऱ्या बदलांवरही त्यांनी भाष्य केले. सागरी मार्गासह बीपीटीच्या जागांवर राबवणाऱ्या विविध प्रकल्पांविषयीही त्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमात क्रीडा, कला, साहित्य, मनोरंजन, शिक्षण, उद्योग, राजकारण आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांसह तज्ज्ञ मंडळींनी उपस्थिती दर्शवली. (प्रतिनिधी)
पाच वर्षांत महाराष्ट्र बदलणार - मुख्यमंत्री
By admin | Published: October 31, 2015 12:46 AM