Join us  

एकत्र येऊन काम करणे काळजी गरज; भाजपा, मनसे अन् शिंदे गटाच्या युतीवर केसरकरांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 1:45 PM

राजू पाटलांच्या विधानावर आता शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे.

मुंबई- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी युतीवर भाष्य केलं होतं. 

हे सरकार आम्ही दिलेल्या सूचना ऐकतं. त्यानुसार काम करतं. अशी कामे होत असताना जर जवळीक होत आहे. आम्ही काही सत्तेत नाही. सत्तेत बसायच्या आधी आम्ही भाजपला मतदान केलं होतं. आम्ही सरकारला पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी युतीसाठी होकार दिल्यास आम्हीही त्यासाठी तयार असू, असं विधानही राजू पाटील यांनी यावेळी केलं.

राजू पाटलांच्या या विधानावर आता शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे. राजू पाटील यांनी महायुतीचे संकेत दिले असले तरी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत मी बोलणार नाही. परंतु एकत्र येऊन काम करणे ही काळजी गरज आहे. आम्हाला मुंबईकरांचे जीवन सुखी करायचे आहे, असं दीपक केसरकर म्हटलं आहे. तसेच परस्परांना सहकार्य करण्याचे राजू पाटील यांच्या वक्तव्याचे मी आभार आहे, असंही दीपक केसरकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दगडाला पाझर फुटला नाही, म्हणूनच ५० आमदार फुटले. उद्धव ठाकरेंना तेव्हा पाझर फुटला असता, शिवसैनिकांना साध्या भेटी दिल्या असत्या, तसेच जनतेची गाऱ्हाणी समजून घेतली असती तर पक्षामध्ये बंड का झालं असतं का?, असा सवाल दीपक केसरकरांनी उपस्थित केला आहे. 

शिंदे गटाचे २२ नव्हे तर ५० आमदार हे भाजपाच्या संपर्कात-

आम्ही कुणावर टीका करत नाही. फक्त लोकांना भडकवून सरकार चालवता येत नाही. त्यासाठी कामं करावी लागतात. आमची दुःख आमच्या हृदयात आहेत. ती सांगून आम्हाला मतं मिळवायची नाहीत. आमच्या कामावर आम्हाला मतं मिळवायची आहेत. ते आम्ही करून दाखवू, असंही दीपक केसरकर म्हणाले. तसेच शिंदे गटातील २२ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. यावर देखील दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे. शिंदे गटाचे २२ नव्हे तर ५० आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. भाजपासोबत आमची मैत्री घट्ट आहे. त्यामुळे ठाकरे गटाला त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात खोचक टीका त्यांनी केली आहे. 

टॅग्स :दीपक केसरकर राज ठाकरेमनसेभाजपा