Join us

'वाघाची नखं अजूनही धारदार आहेत'; मातोश्रीबाहेर राणा दाम्पत्यांना बच्चू कडूंनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:49 PM

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खासदार नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा यांचा इशारा दिला आहे.

मुंबई- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात संकटं वाढली आहेत. मुख्यमंत्री घरातून बाहेर निघत नाहीत. संकटांमधून बाहेर निघण्यासाठी त्यांनी हनुमान चालीसा वाचावी, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं होतं. मातोश्री आमचं श्रद्धास्थान आहे. आम्ही अत्यंत श्रद्धेनं अमरावती ते मातोश्री अशी वारी करु. आम्ही शांतपणे जाऊन हनुमान चालीसाचं वाचन करु, असा निर्धार राणा दाम्पत्याने केला आहे. 

राणा दाम्पत्याला मुंबईत जाऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला होता. मात्र तरीही अमरावतीमधील अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मुंबईत दाखल झाले आहेत. गनिमी काव्याने राणा दाम्पत्य आज पहाटे मुंबईत पोहोचलं आहे. परंतु ते कुठे आहे हे समजू शकलेलं नाही. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. 

शिवसैनिकांना राणा दाम्पत्याला रोखण्याचा इशारा दिला असताना राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आम्ही शिवसैनिकांसोबत असल्याचे जाहीर केले आहे. कोणते मुद्दे घ्यावेत याचं कोणतही भान राणांना राहिलेलं नाही. प्रसिद्धिच्या झोतात येण्यासाठी हा सर्व प्रकार सुरु आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. 

राणा दाम्पत्य ज्या जिल्ह्याचे खासदार, आमदार आहेत, तेथील लोकांचा अपमान होऊ नये, असं वाटतं, असं बच्चू कडू यावेळी म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या वाटेला गेलात, तर काय होईल सांगता येणार नाही. वाघाची नखं अजूनही धारदार आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे. 

दरम्यान, मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं वाचन करण्याचा निर्धार राणा दाम्पत्याने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मातोश्री या त्याच्या खासगी आणि वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानची सुरक्षाही वाढवली आहे. 

टॅग्स :नवनीत कौर राणारवी राणाउद्धव ठाकरेशिवसेनाबच्चू कडू