Join us  

१ नोव्हेंबरला व्हिडीओ येणार, १५ दिवसांनी चित्रपट पूर्ण होणार; बच्चू कडू राणांविरोधात आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 4:46 PM

बच्चू कडू यांच्या या भूमिकेवर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई- सध्या सत्तेत असणाऱ्या २ आमदारांमध्येच खोक्यावरून जुंपली आहे. अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यात सध्या जोरदार वाद सुरू आहे. हा वाद इतका टोकाला पोहचला आहे की, त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचं अस्तित्वही पणाला लागलं आहे.

बच्चू कडू यांनी ७-८ आमदार माझ्या संपर्कात असून रवी राणा यांनी केलेल्या आरोपामुळे सर्वजण नाराज आहेत. १ तारखेपर्यंत जर रवी राणा यांनी पुरावे दिले नाहीतर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले नाही तर आम्ही वेगळा विचार करू असा इशाराच कडू यांनी दिला आहे. तसेच १ नोव्हेंबरला एक व्हिडिओ जारी करणार असल्याचंही बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे. 

उद्या या सगळ्यात माझी राख झाली, तरी माझ्याविरोधात झालेल्या आरोपांबद्दल मी पेटणार...मला मंत्रीपदाचं काही देणं-घेणं नाही. मी एवढा कच्चा माणूस नाही, असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. तसेच एक तारखेला राणाच्या बैठकीतले व्हिडीओ रिलीज करणार आहे. कसं षडयंत्र रचलं जातं ते सगळं समोर येईल. एक तारखेला ट्रेलर असेल. त्यानंतर चित्रपट १५ दिवसांनी पूर्ण होईल, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे. 

दरम्यान, दरम्यान, बिनबुडाचे आरोप करुन प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न कोणी करु नये. माझ्या संपर्कात सध्या सरकारमध्ये नाराज असलेले ७ ते ८ आमदार असल्याचा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच एक नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर केले नाही आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठोस भूमिका घेतली नसल्यास आपण धमाका करणार असल्याचा इशारा देखील बच्चू कडू यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

...तर जशाच तसे उत्तर देवू- रवी राणा

आमदार बच्चू कडू जे काही करतात ते मला सांगायची गरज नाही. त्यांना सिद्धांत, विचार नाही. जे काही ते करतात, ते तोडपाणीसाठीच. दुसऱ्यांना दम देतात, गलिच्छ, बेछूट बोलतात. ते ज्या स्तरावर जातील, त्या स्तरावर मलाही जाता येते. मी खिसे कापून किराणा वाटप करतो, हे अगोदर सिद्ध करावे, असे रवी राणा ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. कडू यांचे आंदोलन तोडपाणीसाठीच असते. यापूर्वी सोफिया प्रकल्पाचे आंदोलन सर्वांनाच माहिती आहे. आमचे आंदोलन शेतकरी, गरिबांसाठी झाले, दिवाळीत जेलमध्ये गेलो, हा इतिहास आहे. आमदार कडूंनी अरेरावीची भाषा बंद करावी, मी धमकीला भीत नाही, असे थेट आव्हान रवी राणा यांनी दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :बच्चू कडूरवी राणामहाराष्ट्र सरकार