Join us  

Ameya Khopkar : "ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत?"; मनसेचा रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 10:44 AM

MNS Ameya Khopkar : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी खड्ड्यांवरून निशाणा साधला आहे

गेल्या काही वर्षांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरण होत आहे; मात्र पावसाळ्यात या सिमेंटच्या रस्त्यावर जागोजागी पडत असलेल्या खड्ड्यांनी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. नागरिकांच्या मणक्यांचा अक्षरश: खुळखुळा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पुढील दोन वर्षांत ४०० किमी रस्तेबांधणीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, या कामासाठी सहा हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहेत. 

राज्य सरकार आणि पालिकेने येत्या दोन वर्षांत मुंबईचे काँक्रीटीकरण करून खड्डेमुक्त रस्ते करण्याचा निर्धार केला आहे. याच दरम्यान मनसेने रस्त्यावरील खड्ड्यांवरून रोखठोक सवाल विचारला आहे. "ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत?" असा प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (MNS Ameya Khopkar) यांनी खड्ड्यांवरून निशाणा साधला आहे. तसेच "तुम्ही सुविधा दिल्या नाहीत म्हणून उद्या चित्रपटउद्योग राज्याबाहेर गेला तर त्यांना चूक तरी कसं म्हणणार?" असंही म्हटलं आहे. 

अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रस्त्यावरील खड्ड्यांचे काही फोटो शेअर केले आहेत."मुंबईला मायानगरी म्हणतात ते या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीमुळे. इथे ४२ आउटडोअर शूटिंग लोकेशन्स आणि १६ स्टुडिओ फ्लोअर्स आहेत. टीव्ही मालिका, चित्रपट यांच्या शूटिंगसाठी हजारो माणसं इथे उपनगरातून येत असतात, पण आत प्रवेश केल्यावर अशा घाणेरड्या रस्त्यांवरुन ये-जा करावी लागते. ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत? तुम्ही सुविधाच दिल्या नाहीत म्हणून उद्या हा चित्रपटउद्योग राज्याबाहेर गेला तर त्यांना चूक तरी कसं म्हणणार?" असं खोपकर यांनी म्हटलं आहे. 

मुंबई पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार १ एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत खड्ड्यांच्या ४८ हजार ६०८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी मार्च २०२३ अखेरपर्यंत ३३ हजार ७९१ खड्डे कोल्डमिक्स व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बुजविण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे; मात्र शहर, पूर्व व पश्चिम उपनगरात तब्बल १४ हजार ८१७ खड्ड्यांचे साम्राज्य आजही कायम आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यांतून मार्गक्रमण करावे लागणार आहे.  

टॅग्स :मनसेमुंबईखड्डे