Join us  

“राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे, सावरकरांवर बोलायची लायकी आहे का?” राज ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 7:58 PM

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. “राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत. ते बोलतात तेव्हा मागून आरडी बर्मन बोलतात का असं वाटतं. सावरकरांवर बोलण्याची लायकी आहे का? कोण आहेत माहिती आहे का? कुठे ठेवलं होतं, काय हाल सहन केले. एक स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट असते. आम्ही त्याचा विचार करत नाही. फक्त बोलणार दयेचा अर्ज केला. सर सलामत तो पगडी पचास,” असं म्हणत राज ठाकरेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

कृष्ण निती काय सांगते. चांगली गोष्ट जर घडणार असेल, त्यासाठी खोटं बोलावं लागलं तर बोला, पण ती गोष्ट होणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं. ज्याला स्ट्रॅटजी समजत नाही तो गुळगुळीत मेंदूचा. सगळ्या गोष्टी थांबणं आवश्यक आहे. काँग्रेसला जसं सांगणं आहे तसं भाजप आणि अन्य लोकांनाही सांगणं आहे. दोन्ही बाजूनं आमच्या सर्व लोकांना, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, महापुरूष म्हटले गेले, आयकॉन झाले, यांची बदनामी करून हाती काय लागणारे? असा सवालही त्यांनी केला. या देशासमोर अनेक प्रश्न उभे आहेत. अनेक मोहल्ले उभे राहतायत त्यातला सुरक्षेचा प्रश्न गांभीर्यानं ने घेता आम्ही एकमेकांची बदनामी करतोय, असंही ते म्हणाले.

वय काय बोलताय काय?“उद्योगधंद्यांवर त्या दिवशी धोतर बोललं. वय काय, बोलतायत काय? काय चाललंय? राज्यपाल पदावर बसलायत म्हणून मान राखतोय. महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. गुजराती मारवाडी परत गेले तर काय होईल असं महिन्याभरापूर्वी म्हणाले. पहिले त्या समाजाला विचारा आपलं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? तुम्ही उद्योगपती, व्यापारी आहात तर आपल्या राज्यात का नाही उद्योग थाटले. याचं कारण तिकडे महाराष्ट्रासारखी सुपिक जमीन नव्हती,” असंही ते म्हणाले. महाराष्ट्र समृद्ध होताच, हे आम्हाला कोश्यारींकडून ऐकायचं नाही. आज त्या लोकांना सांगितलं तर ते आपल्या राज्यात जातील का? सभोवतालचं वातावरण आहे, परदेशातील कोणताही व्यवसाय आणायचा असेल तर त्याचं प्राधान्य महाराष्ट्रच असतो, असंही ते म्हणाले.

टॅग्स :राहुल गांधीमनसेराज ठाकरे