Join us

'...त्यांना 'भैय्या भूषण पुरस्कार' द्यायला पाहिजे'; संजय राऊतांना मनसेने लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 4:25 PM

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

मुंबई- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. सत्ताधारी भाजपाचे योगी आदित्यनाथ सरकार आणि विरोधकांमध्ये तुंबळ आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. 

शिवसेनेचं उत्तर प्रदेशात काय काम आहे? असं अनेकजण विचारतात. पण, २०२४ पर्यंत पूर्ण उत्तर प्रदेश भगवा होईल तेव्हा त्यांना समजेल शिवसेनेचं काय काम होतं, असं राऊत म्हणाले. तसेच आमच्याकडे खूप हिंदी भाषिक लोक आहेत. अर्धी मुंबई हिंदी बोलते. महाराष्ट्रात जिथंही जातो तिथे जास्तीत जास्त लोक उत्तर प्रदेशातील लोक आहेत. आमचं उत्तर प्रदेशासोबत नातं आहे, असं संजय राऊत यांनी यावेळी प्रचारसभेत सांगितलं.

संजय राऊतांच्या या विधानावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टोला लगावला आहे. अर्धी मुंबई हिंदी बोलते असा जावई शोध लावणाऱ्यांना 'भैय्या भूषण पुरस्कार' द्यायला पाहिजे, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली. हे मतदान सात टप्प्यांत पार पडणार असून, अखेरच्या टप्प्यातील मतदान ७ मार्च रोजी आहे. उत्तर प्रदेशसह देशातील अन्य पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी एकत्रितपणे १० मार्च रोजी होणार आहे. 

शिवसेनेचे ३९ उमेदवार निवडणूक रिंगणार

भाजपवर सातत्याने टीका करताना कडवी टक्कर देण्यासाठी शिवसेनेने आपले उमेदवार निवडणूक रिंगणार उतरवले आहेत. भाजपला देशात आव्हान उभे करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. एकूण ४०३ जागांसाठीच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ३९ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती मिळाली आहे. वास्तविक शिवसेनेने ५९ उमेदवारांना तिकीट दिले होते. मात्र, यातील २२ जणांच उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्याने आता शिवसेना उमेदवारांची संख्या ३९ वर आल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :संदीप देशपांडेमनसेराजकारणसंजय राऊतशिवसेना