MNS Letter To RSS Chief Mohan Bhagwat: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यंदापासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्यात येणार आहे. हिंदी भाषा अनिवार्य करण्याला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याला राज्यातील सात शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्या दिवसापासून हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही एक्सवर एक पोस्ट करत हिंदी भाषा सक्तीला स्पष्ट विरोध करत थेट इशारा दिला आहे. ठाकरे गटानेही हिंदी सक्तीला स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवला आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते हिंदी सक्तीच्या विरोधात आहेत. तर महायुतीचे नेते हिंदी सक्तीबाबत सकारात्मक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. यातच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS सरसंघचालक मोहन भागवत यांना एक खुले पत्र लिहिले आहे.
संदीप देशपांडे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना लिहिलेले पत्र जशेच्या तसे...
प्रति,
श्री. मोहनजी भागवत,सरसंघचालक,राष्ट्रीय स्वयंसेवक संघयांस सस्नेह जय महाराष्ट्र!
माननीय महोदय,
खरे तर आपल्याला प्रत्यक्ष भेटून आमच्या भावना आपल्या समोर मांडाव्यात अशी मनापासून इच्छा होती. पण माझ्यासारख्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला भेटता येईल का? ही शंका आहे म्हणून हे खुल पत्र आपल्याला लिहीत आहे. हिंदुस्थानचा इतिहास आहे, मराठ्यांनी जवळ-जवळ पूर्ण भारतावर राज्य केले. इंग्रजांनी सुद्धा हिंदुस्थान जिंकला तो मुघलांकडून नाही तर मराठ्यांकडून, होळकरांचे इंदूरमध्ये राज्य होते. शिंदेच ग्वालियरमध्ये होते. गायकवाड बडोदामध्ये होते. अगदी दक्षिणेमध्ये तंजावर वर सुद्धा मराठ्याचं राज्य होते. खर तर जवळ जवळ २०० वर्षे मराठ्धांचे अधिपत्य हे हिंदुस्थान वर होते. एवढ असून सुद्धा मराठ्यांनी कधी ही मराठी भाषा ही तिथल्या राज्यांवर लादली नाही. अगदी गुगल नसताना सुद्धा त्यांना मराठी ही संपर्काची भाषा कराविशी वाटली नाही. उलटपक्षी शिंदे हे ग्वालियरला जावून सिंधिया झाले.
हा सगळा इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे सध्या शालेय शिक्षणात करण्यात आलेली हिंदी भाषेची सक्ती. मराठी माणूस हा सहिष्णु आहे याचा गैरफायदा घेतला जात आहे. महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस हा सुद्धा हिंदू आहे, गुजरात मध्ये राहणारा गुजराथी माणूस सुध्या हिंदू आहे, तामिळ बोलणारा सुध्दा हिंदू आहे. 'पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड उत्कल बंग' हे आपल्या देशाच्या राष्ट्रगीतात आहे. विविधतेत एकता है नुसत्या देशाच वैशिष्ट्य नाही तर आपल्या हिंदू धर्माचे सुद्धा वैशिष्ट्य आहे. ख्रिस्ती धर्म पाळणारे हे सगळेच इंग्रजी बोलत नाहीत, ते जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश इत्यादी भाषा बोलतात. अगदी भारतात तर ख्रिस्ती धर्म वाढवण्यासाठी त्यांनी तामिळ, मल्याळम आणि कोंकणी ही बोलीभाषा आत्मसात केली. ही सगळी उदाहरणे दयायचे कारण धर्म वाढवायचा असेल टिकवायचा असेल तर सर्व भाषांना सामावून घेणे गरजेचे आहे. एका समूहाची भाषा दुसऱ्या समूहावर लादून धर्म वाढू शकत नाही. पाकिस्तानमधील बंगाली बोलणारे मुसलमान हे मुसलमान असूनही भाषेच्या सक्तीमुळे वेगळे राष्ट्र झाले हा ताजा इतिहास आहे.
ज्या पद्धतीने सरकार हिंदी भाषेची सक्ती करून हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे. त्यामुळे हिंदू समाज हा एकत्र येण्याऐवजी विखुरण्याचीच शक्यता अधिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि विचारांच्या आधाराव उभी झालेली ही संघटना आहे. म्हणूनच हे सगळे सांगण्याचे धाडस करीत आहे. हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याच्या या कृतीला आपण चाप बसवाल हा आमचा ठाम विश्वास आहे, म्हणून हा पत्रप्रपंच. आपण जर वेळ दिलीत तर प्रत्यक्ष भेटून आपल्या समोर भावना व्यक्त करायला नक्की आवडेल.
धन्यवाद.