खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिला लोकसभेतील सर्व समितींचे राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:07 AM2021-09-26T04:07:17+5:302021-09-26T04:07:17+5:30
मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारतीय जनता पक्षाचे श्रद्धास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती देशभरात साजरी ...
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे श्रद्धास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती देशभरात साजरी होत असताना उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी संसदीय कार्य समिती रेल्वे समिती आणि गृहनिर्माण समिती या सर्व समित्यांचा राजीनामा दिल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. बोरिवली पश्चिम, लोकमान्य नगर येथील त्यांच्या कार्यालयातून फेसबुक लाइव्हवरून त्यांनी ही घोषणा केली.
आपला केंद्रीय विविध समित्यांचा राजीनामा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठविला आहे असे त्यांनी सांगितले. येत्या २६ जानेवारीपर्यंत नागरिकांना जर न्याय मिळाला नाही तर आपण आपल्या खासदारकीचासुद्धा राजीनामा देऊ असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर मिळावे म्हणून असे स्वप्न असून त्यासाठी मी संघर्ष करत आहे. याच संदर्भात मी माझा राजीनामा प्रल्हाद जोशी यांना पाठवला असून ते स्वीकारतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच डॉ. योगेश दुबे यांच्यामार्फत मानवाधिकार आयोगापर्यंत त्यांनी पाठपुरावा केला. मात्र अजूनपर्यंत २०१७ च्या कायद्याची अमलबजावणी होत नसल्याने अनेक प्रकल्प रेंगाळलेले आहेत. पहिल्या माळ्यावर राहणाऱ्यांना सशुल्क घर मिळण्यासाठीही कोणते ठोस पाऊल या महाविकास आघाडी सरकारने उचललेले नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे मुंबईच्या झोपडपट्टीवासीयांना न्याय नसल्याची टीका त्यांनी केली.