Join us  

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 8:02 PM

Mihir Shah Police Custody, Worli Mumbai Hit and Run Case: मिहीर शाह याला घटनेनंतर तब्बल ६० तासांनी मंगळवारी पोलिसांनी शहापूरमध्ये केली होती अटक

Mihir Shah Police Custody, Worli Mumbai Hit and Run Case: वरळीच्या अट्रिया मॉलजवळ घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला तब्बल ६० तासांनंतर मंगळवारी शाहपूरमधून अटक करण्यात आली. अपघातानंतर त्याने आपली कार वांद्रे, कलानगर परिसरात सोडली होती आणि वडील राजेश यांना फोन करून घटनाक्रम सांगितला होता. त्यानंतर मोबाईल बंद करून तो फरार झाला. अखेर मंगळवारी मिहीर शाहला शहापूरमधून अटक करण्यात आली. अपघाताच्या वेळी आपणच कार चालवत असल्याचे त्याने आपल्या कबुलीजबाबात म्हटले असल्याची माहिती आहे. त्यानंतर आज न्यायालयाने मिहीर शाह याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले.

'हिट-अँड-रन' प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला मुंबईतील न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. २४ वर्षीय मिहीर शाह याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील महिला कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून मिहिर फरार होता. पोलिसांनी मंगळवारी त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले. शिवडी येथील मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज नाखवा कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली. "मिहीर शाह हा राक्षसच आहे. त्याला कोळीवाड्यात भरचौकात सोडा. माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांना भेटल्यानंतर मन हेलावून गेले. अपघात होत असतात, पण ही हिट अँड रनची केस म्हणजे हत्याच आहे. सर्वात कठोर शिक्षा झाली पाहिजे. मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात अजूनही राग आणि दु:ख दिसतं. नरकातून राक्षस आला तरी अशा वाईच प्रकारे वागणार नाही. या कुटुंबीयांना आरोपीला शिक्षा झालेली पाहायची आहे," असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

टॅग्स :मुंबईअपघातपोलिसअटक