Join us  

ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत मुलांची सुटका

By सचिन लुंगसे | Published: July 17, 2024 6:53 PM

Mumbai Crime News: गेली सात वर्षे रेल्वे सुरक्षा दल नन्हे फरिश्ते अभियान राबवत असून, आरपीएफने गेल्या सात वर्षांत रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमधून संकटात सापडलेल्या ८४ हजार ११९ मुलांची सुटका करून त्यांचे संरक्षण केले आहे.

 मुंबई - गेली सात वर्षे रेल्वे सुरक्षा दल नन्हे फरिश्ते अभियान राबवत असून, आरपीएफने गेल्या सात वर्षांत रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमधून संकटात सापडलेल्या ८४ हजार ११९ मुलांची सुटका करून त्यांचे संरक्षण केले आहे. रेल्वेच्या विविध विभागांमध्ये काळजी आणि सुरक्षेची गरज असलेल्या लहान मुलांची सुटका करण्यासाठी हे अभियान आहे.

ऑपरेशन नन्हे फरिश्तेच्या आरंभासह २०१८ हे वर्ष महत्वाचे ठरले. या वर्षात एकूण १७ हजार ११२ मुलांची सुटका केली. २०१९ मध्ये १५ हजार ९३२ मुलांची सुटका करण्यात आली. कोविडमुळे २०२० हे वर्ष आव्हानात्मक ठरले. आव्हानांचा सामना करत ५ हजार ११ मुलांची सुटका करण्यात आली. २०२१ मध्ये ११ हजार ९०७ मुलांची सुटका करण्यात आली. २०२२ मध्ये १७ हजार ७५६ मुलांची सुटका करण्यात आली; जी आतापर्यंतची सर्वाधिक संख्या होती. २०२३ या वर्षात आरपीएफने ११ हजार ७९४ मुलांची सुटका केली. २०२४ च्या पहिल्या पाच महिन्यांत ४ हजार ६०७ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये घरातून पळून गेलेल्या ३४३० मुलांचा समावेश आहे. आरपीएफने केवळ मुलांची सुटका केली नाही तर पळून जाणाऱ्या आणि हरवलेल्या मुलांच्या वाढत्या समस्येबाबत जागरुकता निर्माण केली. 

टॅग्स :मुंबई