मुंबई : २४ दिवस आधीच भरून वाहू लागला पवई तलाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 21:11 IST2021-06-12T21:10:01+5:302021-06-12T21:11:06+5:30
Mumbai Powai Lake : औद्योगिक वापरासाठी होतो पाणीपुरवठा. या तलावात होतो ५४५ कोटी लिटर जलसाठा.

मुंबई : २४ दिवस आधीच भरून वाहू लागला पवई तलाव
मुंबई - जोरदार बरसात मुंबईत दमदार एन्ट्री घेणाऱ्या पावसाने पवई तलाव शनिवारी दुपारीच भरून वाहू लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २४ दिवस आधीच हा तलाव भरला आहे. मात्र ५४५ कोटी लिटर जलसाठा असलेल्या या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे या पाण्याचा पुरवठा औद्योगिक वापरासाठी केला जातो.
मुंबईतील या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. गेल्या वर्षी हा तलाव ५ जुलै रोजी भरून वाहिला होता. गेले काही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पवई तलाव शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास भरून वाहू लागला. हे पाणी पिण्यासाठी वापरता नसले तरी पवई तलाव भरून वाहिल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
Maharashtra | Powai lake started overflowing at 3 pm today. This year the lake has started filling up and overflowing about 24 days earlier than last year: Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
— ANI (@ANI) June 12, 2021
- पालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे.
- या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च आला होता.
- या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर आहे. तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.
- तलाव पूर्ण भरलेला असताना ५४५.५ कोटी लीटर (५४५५ दशलक्ष लिटर) पाणी असते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.