Join us

Mumbai Train Update : मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 14:40 IST

ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. शनिवारी (3 ऑगस्ट) तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे.

ठळक मुद्देऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा  फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. शनिवारी तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे.

मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा  फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. शनिवारी (3 ऑगस्ट) तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरू आहे. गोरेगावजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे ठाणे, डोंबिवली यासह अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. 

ठाणे, मुलुंड रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे. तर अंबरनाथ, कल्याणमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं आहे.

मुंबईसह ठाणे उपनगरांत आज मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तसेच तिन्ही मार्गांवरची लोकल सेवाही संथ गतीनं सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून पडणाऱ्या पावसाची तीव्रता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-कॉलेजला सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनीसुद्धा शक्यतो घराबाहेर पडू नये आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यानं रस्त्यावर, बंगले, सोसायटीचा आवारात पाणी घुसलं आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. उस्मा पेट्रोल पंप ते कल्याण शीळ रोड, सुयोग हॉटेलपर्यंत गुडघाभर पाणी आहे. मुसळधार पावसाने कल्याणच्या सखल भागात पाणी साचलं. कल्याण एपीएमसी मार्केट, शिवाजी महाराज चौक, जोशी बाग, मोहम्मद अली चौक, जरीमरी आदी परिसरात पाणी भरले आहे. तर काही ठिकाणी दुकानात पाणी गेल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटठाणेमध्य रेल्वेपश्चिम रेल्वेहार्बर रेल्वे