Join us  

Maharashtra Politics: “विहिंपचे पत्र योग्य, दांडिया हा फक्त मनोरंजनाचा भाग नाही तर एक धार्मिक कार्यक्रम”: मंगलप्रभात लोढा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 4:35 PM

Maharashtra News: आम्ही मुंबईतल्या प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांच्या समस्या एैकून त्या ॲान स्पॅाट सोडवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

Maharashtra Politics: आताच्या घडीला घटस्थापना होऊन पुढे नऊ दिवस नवरात्रोत्सवाची धूम संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. मात्र, दांडिया कार्यक्रमांवरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. विश्व हिंदू परिषदेने आधार कार्ड पाहून केवळ हिंदूंना दांडिया कार्यक्रम स्थळी प्रवेशाची परवानगी आयोजकांनी द्यावी, अशी मागणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. यातच भाजप नेते तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी समर्थन केल्याचे सांगितले जात आहे. 

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी विश्व हिंदू परिषदेच्या मागणीचे समर्थन केले. तसेच गुजरातमध्ये तसे काही प्रकार घडले आहेत. दांडिया हा काही फक्त मनोरंजनाचा भाग नाही हा एक धार्मिक कार्यक्रम आहे. ज्यांना पुजा करण्यात रस नाही त्यांनी यायच की नाही हा प्रश्न आहेच. मात्र याबाबत योग्य ते अधिकारी किंवा आयोजक याबाबत निर्णय घेतील, असे लोढा यांनी स्पष्ट केले. 

भाजपकडून आता मंत्री तुमच्या दारी उपक्रम

मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भाजपकडून आता मंत्री तुमच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी बोलताना, जे घरात बसून होते, ज्यांनी घरात बसूनच सरकार चालवल त्यांनी घरात बसून राहिल्यानच ही वेळ आली आहे. आम्ही मुंबईतल्या प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांच्या समस्या एैकून त्या ॲान स्पॅाट सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन देत, २५ वर्षांत जे काही पालिकेत जे सुरू आहे, त्यानुसार जर कारवाई करायचे ठरवल तर अधिकारी शिल्लक उरणार नाही, असा टोला लोढा यांनी लगावला. 

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपकडून शिवसेनेला मात देण्यासाठी यापूर्वीही मराठी कट्टासारख्या उपक्रमांतून प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन मुंबईतील आमदारांनी मुंबई महानगरपालिकेत होत असलेला भ्रष्टाचार आणि शिवसेनेकडून न झालेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला होता. प्रत्येक वार्ड स्तरावर झालेल्या या उपक्रमाला मुंबईतील जनतेने प्रतिसाद दिला होता. मुंबईतील मराठी नागरिकांनी आपल्या समस्या या उपक्रमातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता राज्यातील सत्तांतरानंतर पुन्हा एकदा मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपने नवा फॅार्म्युला पालकमंत्री तुमच्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे.

 

टॅग्स :नवरात्रीमंगलप्रभात लोढामुंबई