Join us  

"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 9:19 AM

२२ सप्टेंबरला सिनेट निवडणुकीचं मतदान पार पडणार होतं, तत्पूर्वीच मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढत या निवडणुका पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.

मुंबई - मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागून असलेली मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक २२ सप्टेंबर २०२४ ला पार पडणार होती. परंतु विद्यापीठा पुन्हा एकदा एक परिपत्रक काढून या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील निवडणुकीवेळीही रात्रीच्या वेळेस परिपत्रक काढले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा अशाप्रकारे परिपत्रक काढून निवडणूक पुढे ढकलली. प्रत्येक वेळी रात्री परिपत्रक निघते, त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा कारभार रात्रीस खेळ चाले या मालिकेसारखा चालू आहे की काय असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी विचारला आहे.

अमित ठाकरेंनी याबाबत फेसबुकवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, मुळात कोणतीही निवडणूक, मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची असो, विधानसभेची असो, लोकसभेची असो, अथवा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका असो, या सहकारी व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीवर आणि परीश्रमांवर लढवल्या जातात. त्यासाठी राजकीय संघटनांचे, विद्यार्थी संघटनांचे अनेक सहकारी व पदाधिकारी दिवस-रात्र परिश्रम करत असतात. परंतु, मुंबई विद्यापीठाने जर सिनेट पदवीधर निवडणुका जाहीर करून रद्द करण्याचेच धोरण अवलंबले असेल, तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय निवडून आलेले सिनेट सदस्य हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देतात. त्यामुळेच या निवडणुकांचे गांभीर्य विद्यापीठाला लवकरात लवकर समजले तर बरे होईल. मागील वेळीसुद्धा जेव्हा विद्यापीठाने निवडणुका रद्द केल्या होत्या, तेव्हा मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या बाबतीत मुंबई विद्यापीठाच्या अनाकलनीय कारभाराचा जाहीर निषेध केला होता. मुंबई विद्यापीठ हे राजकीय दबावाला बळी पडत असून, एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे. म्हणूनच यावेळी जेव्हा मुंबई विद्यापीठाने पुन्हा निवडणुका जाहीर केल्या, त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या निवडणुकांचा सखोल अभ्यास केला आणि निवडणुका कायद्याला धरून नसल्याचे लक्षात आल्याने त्या पुन्हा पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता आधीच व्यक्त केली असंही मनविसे अध्यक्ष अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझे सहकारी निवडणूक लढवण्याच्या बाजूने होते. त्यांचा सन्मान राखत त्यांना विद्यापीठाचा भविष्यातील भोंगळ कारभार समजावून सांगितला आणि त्यांनाही परिस्थितीची जाणीव झाली. त्यामुळेच माझ्या सहकारी आणि पदाधिकाऱ्यांचे परीश्रम वाया जाऊ नयेत, म्हणून आम्ही २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या सिनेट पदवीधर निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. काल मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत, हे पाहून आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. मुंबई विद्यापीठ प्रशासनाला लवकरच निवडणुकीचा चालवलेला हा खेळ बंद करण्याची सद्बुद्धी येवो असा खोचक टोला अमित ठाकरेंनी लगावला आहे.

...म्हणून सरकार घाबरलं, वरूण सरदेसाईंचा आरोप

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचे मतदान १ दिवसावर असताना परत एकदा स्थगित केली. युवासेना १०/१० जागा जिंकणार हे कळून चुकल्या मुळे सरकार घाबरले.गेल्या वर्षी हेच केले होते. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया परत राबवली. परत मतदार नोंदणी झाली, नवीन परिपत्रक काढले आणि हे परत घाबरले असा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी केला आहे.

टॅग्स :अमित ठाकरेवरुण सरदेसाईमुंबई विद्यापीठनिवडणूक 2024