महागाईने मुंबईकरांची कंबरमोड!

By admin | Published: October 24, 2015 02:46 AM2015-10-24T02:46:43+5:302015-10-24T02:46:43+5:30

‘अच्छे दिन आयेंगे’ अशा आश्वासनांचे गाजर दाखवून मते मिळविलेल्या सत्ताधाऱ्यांच्या राज्यात मुंबईकरांचे जिणे मुश्कील झाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात अन्नधान्याचे भाव

Mumbaikar's KumbharMode! | महागाईने मुंबईकरांची कंबरमोड!

महागाईने मुंबईकरांची कंबरमोड!

Next


- लिनल गावडे,  मुंबई

‘अच्छे दिन आयेंगे’ अशा आश्वासनांचे गाजर दाखवून मते मिळविलेल्या सत्ताधाऱ्यांच्या राज्यात मुंबईकरांचे जिणे मुश्कील झाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात अन्नधान्याचे भाव गगनाला भिडलेले असल्याने मुंबईकरांना आर्थिक गणित जुळवता जुळवता कंबरमोड करावी लागतेय. त्यात अन्नधान्याचा साठा करून भ्रष्टाचाराचे लोण आल्याने मुंबईकरांचे ‘टेन्शन’ अधिकच वाढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तूरडाळीच्या भावांमध्ये झालेली लक्षणीय वाढ सामान्य जनतेच्या डोक्याला ताप झाली आहे. भारतीय जेवणात आवश्यक असलेल्या डाळीला आहारातून वगळता येणार नाही. म्हणून किराणा मालातून तूरडाळ विकत घेण्याचा आकडा ग्राहक काही किलोंनी कमी करत आहेत. बाजारात सध्या तूरडाळीची किंमत १७० पासून २२० रुपयांपर्यंत आहे. मुंबईकर १७० ते २०० किमतीच्या आतील डाळ घेणे पसंत करतात, असे अनेक किराणा माल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
दादर येथील कीर्तिकर मार्केटमधील शाह जाधवजी किराणा दुकान मालकाने सांगितले की, ग्राहक पूर्वीसारखी ५ किलो किंवा ७ किलोंची मागणी करत नाहीत तर ही मागणी आता एक किलोवर घसरली आहे. तर महागाईच्या या भस्मासुराला आळा घालण्यासाठी ‘गृहकर्तव्यदक्ष’ महिलांनीच तूरडाळीला पर्याय निवडून काढून आपले बजेट सांभाळले आहे. तूरडाळीचा कमीतकमी वापर करून आता अनेक जण मूगडाळ आणि इतर डाळींना पसंती देत आहेत.

हॉटेलांमध्ये तुरळक वाढ
वाढत्या डाळीच्या दराचा परिणाम हॉटेलच्या ‘दालफ्राय’मध्ये थोड्या प्रमाणात झाला आहे. अनेक हॉटेलांनी यांच्या किमतीत आधीच ५ ते ७ रुपयांनी वाढ केल्याचे मान्य केले. महागाईचा फटका हॉटेल चालकांना नेहमीच बसतो. याचा आधीच विचार करून पदार्थांच्या किमती ठरत असतात. तूरडाळीच्या वाढत्या भावांचा परिणाम हॉटेलांवर झालेला नाही आणि डाळीच्या दर्जातही झालेला नाही, असे दादर येथील तृृप्ती हॉटेलच्या मालकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.


डाळ हा भारतीय जेवणातला अविभाज्य घटक आहे. लहान मुलांना डाळीशिवाय जेवण आवडत नाही. डाळींच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की, ७ किलोवरून ३ किलो डाळ महिन्यासाठी खरेदी करावी लागत आहे. या डाळींच्या किमतीत घट करावी, नाही तर मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडेल.
- मनीषा कदम, गृहिणी,चारकोप

डाळींच्या किमती पाहून डाळ खाणे तर सोडू शकणार नाही. म्हणून कमीत कमी डाळ करण्यावर भर दिला आहे. आता आमटी, सांबार आणि भाज्यांचा वापर करून रस्साभाजी करून तूरडाळीची सल भरून काढतो.
- प्रतिमा गोऱ्हाटे, गृहिणी,घाटकोपर

तूरडाळींच्या किमतीमुळे आता कमीत कमी डाळ घ्यावी लागते. या महागाईचा चटका आम्हाला खूप लागतो. तूरडाळीची किंमत लवकरात लवकर कमी न झाल्यास याचा मोठा फटका सामान्यांना बसणार आहे.
- समीक्षा तांबे, गृहिणी, डोंबिवली

Web Title: Mumbaikar's KumbharMode!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.