Join us

वाहनांच्या जंजाळात गुरफटून गेले मुंबईचे रस्ते, रोज धावतात ३५ टक्के वाहने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 8:59 AM

traffic : जानेवारी २०२२ च्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल ४.०९ कोटी इतकी वाहनांची संख्या होती. त्यापैकी एकट्या मुंबईत ४२.१३ लाख इतकी वाहनांची संख्या असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : दक्षिण, मध्य किंवा पश्चिम उपनगर असो संपूर्ण मुंबईत वाहतूककोंडी होत नसेल, असे एकही ठिकाण सापडणार नाही. मुंबईच्या रस्त्यांवरून दिवसाला तब्बल ३५ टक्के वाहने धावत असल्याचे चित्र सध्या आहे. त्यात दिवाळीची भर पडल्याने दिवाळीखरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही गेल्या दोन दिवसांत प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. जानेवारी २०२२ च्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल ४.०९ कोटी इतकी वाहनांची संख्या होती. त्यापैकी एकट्या मुंबईत ४२.१३ लाख इतकी वाहनांची संख्या असल्याचे समोर आले आहे.

जानेवारी २०२० मध्ये मुंबईत वाहनांची संख्या ३८ लाख इतकी होती. तर २०२१ च्या तुलनेत यंदाच्या वर्षात बाइकची संख्या ४.९ टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने मुंबईच्या प्रदूषणातही लक्षणीय भर पडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, यंदाच्या वर्षात जीप आणि हलक्या वाहनांच्या संख्येतही ३.५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

खासगी चारचाकी वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने खासगी बसगाड्यांची संख्या घटल्याचेही स्पष्ट झाले आहे. राज्यात आणि मुंबईत वाहनांची संख्या किती आहे. मुंबईच्या रस्त्यांवरून किती प्रमाणात वाहने धावतात, याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार मुंबईच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांमध्ये गेल्या पाच वर्षांत तब्बल ३५ टक्क्यांची वाढ झाल्याचे उघड झाले आहे. 

प्रतिकिमीला १,९०० वाहनेराज्याच्या तुलनेत मुंबईत गेल्या पाच वर्षांत वाहनांची संख्या १० पटींनी वाढली आहे. मुंबईत प्रति किलोमीटरमागे तब्बल १,९०० वाहने आहेत तर राज्यात प्रती किलोमीटरमागे १२३ वाहने शहरात असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, राज्यभरात तब्बल ५५ लाख दुचाकी वाहने असल्याचे दिसत आहे.

गेल्या ५ वर्षांतील वाहने    मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ ३५ टक्क्यांनी वाढली.    राज्यभरात वाहनांची संख्या १० पटींनी वाढल्याचे दिसते.    मुंबईत प्रतिकिलोमीटरमागे तब्बल १,९०० वाहने आहेत. तर महाराष्ट्रात प्रतिकिलोमीटरमागे १२३ वाहने आहेत.    अवैध पार्कींग, अतिक्रमण, फेरीवाले यांमुळे रस्ते लहान झाले आहेत. भायखळा, मोहम्मद अली रोड, डोंगरी, भेंडी बाजार यांसारख्या ठिकाणी प्रामुख्याने अशी परिस्थिती दिसत आहे.

३.८८ लाख वाहनांची नोंदणीमुंबई सेंट्रल आरटीओने सांगितल्यानुसार मार्च २०२२ मध्ये १२.४६ लाख वाहनांची नोंदणी करण्यात आली. यात ७.४ लाख दुचाकींचा समावेश होता तर ३.८८ लाख चारचाकी वाहनांचा आणि २६,१६० मीटर टॅक्सी आणि २९.६७२ टुरिस्ट कॅब वाहनांचा समावेश होता.मुंबईत जागोजागी मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळेही अनेक भागांत वाहतूककोंडी होत आहे. एकीकडे वाहने विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे तर दुसरीकडे मेट्रोच्या आणि इतर कामांमुळे रस्ते छोटे झाल्याची टीका वाहतूकतज्ज्ञांनी केली आहे. 

टॅग्स :वाहतूक कोंडीमुंबई