लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाळांपाठोपाठ आता धार्मिक स्थळांचे द्वारही उघडण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने महापालिका यंत्रणा सतर्क आहे. तत्पूर्वी रोजची रुग्णवाढ, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी यांचा आढावा पालिका प्रशासन घेत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा आणि ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर चित्रपटगृह, मॉलही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानुसार कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून, रुग्णवाढीच्या दरावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे; तर गणेशोत्सवानंतर १५ दिवस म्हणजे ५ ऑक्टोबरपर्यंत मुंबईतील चित्र स्पष्ट होणार आहे.
मंगळवारी नियमवली
शाळा आणि धार्मिक स्थळे सुरू करताना कोणती काळजी घेण्यात यावी?, कोविड प्रतिबंधक नियमांचे कसे पालन करावे? याबाबत नियमावली तयार करण्यात येणार आहे. ही नियमावली येत्या मंगळवारपर्यंत पालिका प्रशासन जाहीर करण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानंतर १५ दिवसांच्या कालावधीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे का? याचा आढावा घेण्यात येत आहे. हा कालावधी ५ ऑक्टोबर रोजी संपुष्टात येईल, तोपर्यंत मुंबईतील चित्र स्पष्ट होईल.
- सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)