Join us  

मुंबईतील मृतदेहाचे गूढ उकलले; विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून विवाहितेची हत्या केल्याचं उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 9:08 AM

कामगारांना एका मातीच्या ढिगाऱ्याजवळ प्लास्टिकच्या गोणीत अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह सापडला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरमध्ये शुक्रवारी सकाळी प्लास्टिकच्या गोणीमध्ये अर्धवट कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात ट्रॉम्बे पोलिसांना यश आले. अनैतिक प्रेम संबंधाच्या संशयातून सासरच्या मंडळींनी महिलेची हत्या करून मृतदेह फेकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मृत महिलेचा पती, दीर, नंदोई, नंदोइची आई आणि बहीण यांना अटक करण्यात  आली आहे. 

रेश्मा कन्हैयालाल जयस्वाल (२१) असे मृत महिलेचे नाव आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरमध्ये शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास येथील कामगारांना एका मातीच्या ढिगाऱ्याजवळ प्लास्टिकच्या गोणीत अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह सापडला होता. ट्रॉम्बे पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

सासरच्या मंडळींचे कृत्य- महिलेच्या अंगावर असलेली इमिटेशन ज्वेलरी, सलवार कुर्ता यासह घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास करत मृत महिलेची ओळख पटवली. अनैतिक प्रेम संबंधाच्या संशयातून सासरच्या मंडळींनी महिलेची हत्या केल्याचे समोर आले. -  याप्रकरणी कन्हैयालाल भाईलाल जयस्वाल ऊर्फ लाला, (२०, पती), अशोक भाईलाल जयस्वाल ऊर्फ चिंटू (२८, दीर), रवी ऊर्फ प्रेमकुमार रमयालाल  श्रीवास्तव, (३२, नंदोई), मुन्नी रमयालाल श्रीवास्तव (५०, नंदोईची आई), रेशमा रमय्यालाल श्रीवास्तव (२१, नंदोईची बहीण) यांना बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी