Join us  

नमो ११ सूत्री कार्यक्रम सर्व घटकांना न्याय देणारा; राज्यभरात उपक्रम राबवणार,CM शिंदेंची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 6:17 PM

संपूर्ण महाराष्ट्रात नमो ११ सूत्री कार्यक्रम राबवणार मुंबई उपनगर हा प्रथम जिल्हा ठरला. 

मुंबई: आज मुंबई उपनगर जिल्ह्यात 'नमो ११ सूत्री कार्यक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट तथा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यासह मंत्रीमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रात नमो ११ सूत्री कार्यक्रम राबवणार मुंबई उपनगर हा प्रथम जिल्हा ठरला. 

एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, मुंबई उपनगरमध्ये 'नमो ११ सूत्री कार्यक्रमाचा शुभारंभ करताना आनंद होत आहे. शासनाच्या सर्व योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचतील यासाठी आपले शासन प्रयत्नशील असून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक घटकाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर राज्याच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांचे देखील पाठींबा मिळत आहे. हेच लक्षात घेवून राज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात 'नमो ११ सूत्री कार्यक्रम' राबविण्यात येत असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले.

आम्ही सत्तेत आल्यापासून अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवत आहोत दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहोत.या उपक्रमाच्या माध्यमातून विकास होण्यास मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे शासन शेतक-यांच्या पाठिशी असून आपत्तीच्या काळात नियम बाजूला ठेवून आतापर्यंत दिलेली मदत ही आतापर्यंत दिलेली सर्वात अधिक मदत आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच 'नमो ११ सूत्री कार्यक्रम' हा सर्व घटकांना न्याय देणारा उपक्रम असून मुंबई उपनगरमध्ये हा उपक्रम सुरू झाला त्याच धर्तीवर राज्यातही प्रभावीपणे राबविण्याचे त्यांनी सांगितले.

समाजातील सर्व घटकांना लाभ होईल- उपमुख्यमंत्री फडणवीस

'नमो ११ सूत्री' कार्यक्रमातून सर्व समाज घटकांसाठीच्या योजना प्रभावी पणे राबवा. आज मुंबई उपनगरमध्ये हा उपक्रम सुरू होत आहे, याचा अत्यंत आनंद आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या अनेक महत्वपूर्ण निर्णयामुळे देशाला जगातील पाचव्या स्थानावर नेले आहे. त्याच धर्तीवर राज्यातही सर्व घटकांचा विकास करून राज्याला विकासाच्या पथावर नेण्याचा मानस या उपक्रमातून आपण साध्य करत आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कामगार,महिला तसेच समाजातील इतर घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम निश्चीत मदत करेल.प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी नमो ११ सूत्री कार्यक्रम निश्चीत मोलाची भूमिका बजावेल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्र सरकारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमंगलप्रभात लोढा