Join us

Lok Sabha Election 2024: “२०२४ मध्ये मोदी पराभूत होतील, देशात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार बनेल”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 11:30 AM

Lok Sabha Election 2024: नाना पटोले यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: आता हळूहळू सर्वच राजकीय पक्षांना सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वेध लागले आहेत. बहुतांश पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून, अनेकविध पर्यायांची चाचपणी सुरू झाली आहे. यातच आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक मोठा दावा केला आहे. सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

अलीकडेच उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांच्या विधासभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. पाच पैकी चार ठिकाणी भाजपने बाजी मारली. तर पंजाबमध्ये आपने काँग्रेसची सत्ता उलथवत बहुमत सिद्ध केले. यानंतर काँग्रेस वर्तुळात खळबळ उडाली आणि चर्चांच्या फेऱ्या झडायला सुरुवात झाली. देशातील काँग्रेसची एकूण परिस्थिती खालावत चालल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना नाना पटोले यांनी ट्विट करत केलेल्या मोठ्या दाव्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले जात आहे. 

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार बनेल

आगामी सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव होईल. त्यानंतर देशात राहुल गांधी यांच्या कुशल नेतृत्त्वाखाली काँग्रेसची सत्ता येईल, असा मोठा दावा नाना पटोले यांनी केला आहे. तसेच नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपला धारेवर धरले. ओबीसींचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत आणि ते न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करु. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला केंद्र सरकारकडील डाटा ९८ टक्के अचूक आहे; पण ते देत नाहीत. जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, महात्मा फुले व सावित्रिबाई यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले पण त्यांचा अपमान करण्याचे धाडस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले, महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला. 

दरम्यान, जे सत्तेचे पिपासू आहेत. त्यांची सकाळची सत्ता गेल्यानंतर त्यांची जी तडफड सुरू आहे. त्या तडफेचा हा आवाज आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांची बरोबरीची भागिदारी आहे. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार सुरू आहे. कोरोनामुळे हा अजेंडा राबवता आला नाही. आता अजेंडा राबवणं सुरू झालं आहे. विरोधकांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे अफवा उडवून सरकारमध्ये मतभेद निर्माण केला जात आहे. त्यांची सत्तेवर काळी नजर आहे. पण या काळ्या जादूचा प्रभाव पडणार नाही. हे सरकार पाच वर्ष चालेल, असे नाना पटोले यांनी म्हटले होते.  

टॅग्स :नाना पटोलेकाँग्रेसराहुल गांधीभाजपाराजकारण