- मनोहर कुंभेजकरमुंबई - मुंबई महानगरपालिकेने पाणीपट्टीत ८% दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांवर प्रचंड आर्थिक ताण येणार आहे. जलशुद्धीकरणाच्या नावाखाली नागरिकांना आर्थिक संकटात ढकलणे हा अन्यायकारक निर्णय आहे. या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महागाईने आधीच होरपळलेल्या मुंबईकरांवर असा आर्थिक भार लादणे सहनशीलतेच्या पलीकडे आहे. जर सदर दरवाढ मागे घेतली नाही तर, पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडून जल अभियंता विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे कठोर पाऊल उचलले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. मातेले यांनी दिला आहे.
मुख्य जल अभियंता यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून मागणी केली आहे की, पाणीपट्टीतील ८% दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.महानगरपालिकेच्या अपारदर्शक आणि अनियमित कारभारामुळे नागरिकांवर हा भार लादला जात आहे, जो कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.