Join us  

'...तर राज्य कोणत्या दिशेने चाललंय, हे समजून घ्यावं'; वारीसे मृत्यूप्रकरणी शरद पवारांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 2:42 PM

राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन प्रकरण तापण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प होणारच अशी घोषणा केली होती. त्यानंतर एका पत्राकराचा अपघातात संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 

राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीसे यांनी केलेल्या बातमीचा राग मनात ठेवून त्यांच्या दुचाकीला धडक देवून त्यांची हत्या झाल्याच्या घटनेचा रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुकनिदर्शने करुन निषेध केला. हत्येला दोषी असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला कडक शिक्षा करा अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. यावेळी  शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.

सदर प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. पत्रकारांचीही अवस्था अशी झाली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चाललंय, हे समजून घ्यावं, असं शरद पवार म्हणाले. तसेच पत्रकार वारिसे प्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

दरम्यान, शशिकांत वारिसे सोमवारी नेहमीप्रमाणे कामानिमित्त राजापूरला गेले होते...अचानक त्यांच्या घरच्यांना त्यांचा अपघाताबाबत फोन आला. शशिकांत वारिसे राजापूर इथल्या पेट्रोलपंपावर आपल्या दुचाकीवर होते. यावेळी त्यांना वेगानं आलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याच्या थार गाडीची जोराची धडक बसली. त्यानंतर मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा कोल्हापूर इथं मृत्यू झाला. 

काय होती ती बातमी?

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो अशा आशयाच्या बातमीचं कात्रण वारीसे यांनी शेअर केलं होतं. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या बॅनरसंदर्भात ही बातमी होती. या बातमीचं कात्रणत्यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये टाकलं होतं. त्यानंतर दुपारी त्यांच्या दुचाकीला कारची धडक बसली.

टॅग्स :शरद पवारमृत्यू