Join us  

भाजपानेच केली राज ठाकरेंची राजकीय कोंडी; राष्ट्रवादी काँग्रेसनं लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 11:28 AM

महाराष्ट्रात आदेश, फर्मान आणि अल्टिमेटम जाहीर करणारे राज ठाकरे(Raj Thackeray) हे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना प्रत्युत्तर का देत नाही असा सवाल राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई – उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येण्याआधी संबंध उत्तर भारतीयांची जाहीर माफी राज ठाकरे यांनी मागावी अशी अट भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी घातली असून ही अट फक्त राज ठाकरेंचा फुगवलेला इगो पंक्चर करण्यासाठीच आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. आज साधू महंतांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज यांच्या दौऱ्याला कशारितीने विरोध करायचा याबाबत रणनीती ठरणार आहे.

मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनंभाजपा-मनसेला टोला लगावला आहे.  महाराष्ट्रात आदेश, फर्मान आणि अल्टिमेटम जाहीर करणारे राज ठाकरे(Raj Thackeray) हे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना प्रत्युत्तर का देत नाही असा सवाल राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी आज ज्याप्रकारे भाजप खासदार साधुसंतांना एकत्रित करून शक्तिप्रदर्शन करत आहे त्यावरून भाजपची राज ठाकरेंबाबत खरी भूमिका पुढे येत आहे. एरव्ही मुख्यमंत्री योगी अनेक विषयांवर आपलं मत प्रदर्शित करीत असतात परंतु राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत त्यांनी मौन साधण्याची भूमिका स्वीकारली आहे असेही महेश तपासे म्हणाले.

तसेच राज ठाकरे आणि भाजपा यांच्यात अयोध्या प्रकरणात सध्या जो वाद निर्माण झाला आहे त्या विषयावर महाराष्ट्रातले भाजपा नेते मध्यस्थी करतील असे वाटत नाही कारण ज्या उद्देशासाठी राज ठाकरे यांना स्क्रिप्ट लिहून दिली होती त्या राजकीय डावाला महाविकास आघाडीने हाणून पाडले आहे आणि म्हणूनच राज ठाकरे व त्यांचा पक्ष एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे असं राष्ट्रवादीनं सांगितले. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितली तर अयोध्येचा दौरा नक्कीच पूर्ण होईल परंतु महाराष्ट्रात मराठी माणसासमोर परत राज ठाकरे यांना तोंड उघडता येणार नाही अशी राजकीय कोंडी भाजपनेच राज ठाकरेंची केली आहे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद केल्यापासून मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवण्याची मागणी केली. त्यानंतर येत्या ५ जूनला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगण्यात आले. मात्र उत्तर प्रदेशात राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध वाढला आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी संत-महंतांची बैठक होत आहे. या बैठकीला ५० हजार लोक उपस्थित राहतील असा दावा करण्यात आला आहे. इतकेच नाही तर राज ठाकरेंच्या विरोधाला १० लाख लोक येतील असंही सांगितले जात आहे. अयोध्येत बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या घरापासून नवाबगंज भागात रॅली काढली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. राज ठाकरेंनी माफी मागितली तरी त्यांना विरोध कायम राहणार नाही. माझी भूमिका बदलणार नाही. संत-महंतांनीही राज ठाकरे यूपीतील जनतेची माफी मागत नाही तोपर्यंत विरोध करू अशी भूमिका घेतली आहे. उत्तर प्रदेशातील वाढता दौरा लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे ५ जूनच्या राज दौऱ्यावर मोठं संकट उभं राहिल्याचं चित्र उत्तर प्रदेशात दिसत आहे.

टॅग्स :राज ठाकरेभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस