मुंबई : आघाडी सरकारच्या या काळातील वीज घोटाळ्यांची सीबीआय चौकशीची मागणी करून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु विखे यांची मागणी फेटाळून लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने राष्ट्रवादीला एकप्रकारे अभयच दिले आहे. ऊर्जा खात्यावरील चर्चेत बोलताना काल विखे-पाटील यांनी वीज कंपन्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणत माजी ऊर्जामंत्री सुनील तटकरे व अजित पवार यांना लक्ष्य केले. मात्र आज, विखे-पाटील यांनी केलेली सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावताना मात्र वीज कंपन्यांचे विशेष लेखापरीक्षण केले जाईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले. वीज वितरण कंपनीने एमईआरसीकडे आठ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव दिलेला आहे. मात्र ग्राहकांवर विजेचा भार पडू देणार नाही़ मुंबईतील रिलायन्स, टाटा व वीज मंडळाच्या वेगवेगळ्या वीजदरांबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.आघाडी सरकारच्या काळात बावनकुळे भाजपाचे आमदार असले तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याचे म्हटले जात असे. राष्ट्रवादीकडील खात्यांकडून आपल्या मतदारसंघासाठी निधी खेचून नेणाऱ्या भाजपाच्या आमदारांमध्ये ते आघाडीवर होते, हे विशेष!
वीज घोटाळ्यांवरून राष्ट्रवादीला अभय
By admin | Published: March 21, 2015 1:43 AM