Join us  

“दिल्लीश्वरांना खुश करण्यात महायुती सरकार मग्न”; खासदार अमोल कोल्हेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 3:31 PM

सर्वसामान्य युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी, सामान्य, मध्यमवर्गीयांचे नेमके काय म्हणणे आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

NCP SP MP Amol Kolhe News: राज्यातील महायुतीचे सरकार हे भेदरलेले आहे. महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणाऱ्या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणाऱ्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे प्रकाशित ‘महायुतीचे काळे कारनामे’ या पुस्तिकेचे अनावरण प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले.

राज्यातील महायुतीचे सरकार भ्रष्टाचारामध्ये कशाप्रकारे बुडालेले आहे. हे प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांमधून दिसून येते. दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार काम करत आहे. हे करत असताना महाराष्ट्र ज्यांचा आहे. त्या सर्वसामान्य युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी, सामान्य, मध्यमवर्गीयांचे नेमके काय म्हणणे आहे? त्यांच्या स्वप्नातला हा महाराष्ट्र काय आहे? याचा उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्कीच न्याय देईल. तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा असावा याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले. 

मनोज जरांगे बरोबर सरकारने अनेकदा चर्चा केली, पण...

अमोल कोल्हे म्हणाले की, पिंक जॅकेट घालून गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा राज्यासमोर असलेल्या काळे भविष्य बदलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारने अनेकदा चर्चा केली. मुख्यमंत्री मराठा समाजाशी बोलले. देवेंद्र फडणवीस ओबीसी लोकांशी बोलले आहेत, पण कोण कोणाशी काय बोलले हे आम्हाला कळत नाही. कोणी कोणाला काय कमिटमेंट दिली हे माहित नाही. सत्ताधाऱ्यांनी विश्वासात घेतले नाही. सरकार हे म्हणते की, वाघनखे महाराजांनी वापरली. पण म्युझियम म्हणते की, ते खात्रीलायकपणे सांगता येत नाही. नेमके काय आहे? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे. 

दरम्यान, माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हे कँपन लॉन्च करत आहोत, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. त्यात लोक त्यांची मते मांडू शकतात. याचा जाहीरनामा बनवताना विचार केला जाईल. १५ ऑगस्टपर्यंत हे कँपेन सुरू राहील. महायुतीचे काळे कारनामे नावाने पुस्तक बनवून महायुतीविरोधात एल्गार करणार आहोत, असे जयंत पाटील म्हणाले. काळे फुगे फोडून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.

 

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेराष्ट्रवादी काँग्रेसमहाविकास आघाडीमहाराष्ट्र विकास आघाडी