Join us  

विभागीय कार्यालयांवर राष्ट्रवादीचा मोर्चा

By admin | Published: February 09, 2016 2:14 AM

जनतेच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातील विभागीय कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे

ठाणे : जनतेच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातील विभागीय कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. कोकणातील अनेक भागाला ओला व सुका अशा दोन्ही प्रकारच्या दुष्काळांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे तालुकानिहाय पाहणी करून वस्तुस्थितीचा आढावा घेण्यात यावा, त्याचप्रमाणे कोकणात ठिकठिकाणी दुष्काळाच्या परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना ठोस व भरीव मदत, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी सरकारने तत्काळ द्यावी, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राज्यात सध्या कोरड्या व ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. सध्याची परिस्थिती पाहता या विषयाबाबत शासनामार्फत केवळ आश्वासनांची खैरात वाटण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही स्वरूपाची भरीव व ठोस अशी मदत शेतकऱ्यांना दिली जात नाही. त्यामुळे त्यांच्यात सरकारबद्दल असंतोषाची भावना आहे. याचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या नाहीतर त्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मोर्चाचे नियोजन९ फेब्रुवारी रोजी कोकण विभागीय कार्यालय, १५ ला औरंगाबाद विभागीय कार्यालय, १७ ला पुणे, २२ ला अमरावती, २३ तारखेला नागपूर आणि २५ फेब्रुवारी रोजी नाशिक विभागीय कार्यालय येथे धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकण भवनवरील मंगळवारच्या मोर्चामध्ये माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, संदीप नाईक, पांडुरंग बरोरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागातील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.