Join us  

सहकार्यातून विकासाचे नवे पर्व

By admin | Published: April 15, 2016 2:48 AM

‘जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजीन बनू पाहणाऱ्या ‘ब्रिक्स’ सदस्य देशांनी एकमेकांमधील सहकार्य वाढविण्याची आवश्यकता आहे. शहरीकरणाच्या रेट्यात निर्माण झालेल्या समस्या

मुंबई : ‘जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजीन बनू पाहणाऱ्या ‘ब्रिक्स’ सदस्य देशांनी एकमेकांमधील सहकार्य वाढविण्याची आवश्यकता आहे. शहरीकरणाच्या रेट्यात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी एकमेकांना सहकार्याचा हात दिल्यास, येत्या काही वर्षांत ब्रिक्स देशांमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होईल,’ असा विश्वास केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला. मुंबईत भरलेल्या पहिल्या ‘ब्रिक्स मैत्री शहरे परिषदे’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.ब्रिक्स देशांमधील प्रमुख शहरांमध्ये माहिती-तंत्रज्ञान, शहरीकरण, तेथील समस्या या माहितीचे आदानप्रदान करण्याच्या दृष्टीने मुंबईत प्रथमच ब्रिक्स मैत्री शहरे या संकल्पनेवर आधारीत तीन दिवसीय परिषद होत आहे. या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला नायडू यांच्यासह राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर स्नेहल आंबेकर, परराष्ट्र खात्याचे सचिव अमर सिन्हा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या परिषदेत ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील ७० जणांचे शिष्टमंडळ सहभागी झाले आहे.भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे ब्रिक्स सदस्य देशांचाही वेगाने विकास होत आहे. या देशांचा विकासदर हा जागतिक अर्थव्यवस्थेच्या एक चतुर्थांश आहे. त्याचबरोबर ८० टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहते. मैत्री शहरे परिषदेतून शहरीकरण, स्थानिक प्रशासकीय यंत्रणेपुढील आव्हाने यावर साधकबाधक चर्चा होईल. यातून काही ठोस कृती आराखडा तयार होईल, असा विश्वास नायडू यांनी व्यक्त केला. ब्रिक्स देशांमधील संबध दृढ होऊन त्यांच्यामध्ये मैत्रीची आणि सहकार्याची भावना निर्माण व्हावी, याउद्देशाने भारताकडून पुढील काही महिन्यांत कार्यक्रम हाती घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरातील विकासात शहरांचा वाटा मोठा होता. सर्वाधिक रोजगाराच्या संधीही इथेच आहेत. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर भारतात शहरीकरणाला विरोध झाला. या धोरणामुळे शहरीकरण तर थांबलेच नाही उलट शहरातील पायाभूत सुविधांना खिळ बसली. केंद्र आणि राज्यातील नव्या सरकारने शहरांच्या पायाभूत विकासावर भर दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)ब्रिक्स देशांमधील विविध शहरांमधील पायाभूत सेवा सुविधांचा विकास, घनकचरा व्यवस्थापन, परवडणारी घरे, शहरातील वाहतूक व्यवस्था, शहरीकरण आणि समस्यांबाबत पुढील दोन दिवस परिषदेत चर्चा होणार आहे.