Join us  

माध्यमांच्या तीव्र स्पर्धेतही वृत्तपत्र खपाचा चढा आलेख

By admin | Published: May 10, 2017 1:57 AM

टीव्ही, रिडिओ, डिजिटल आणि मोबाईल अशा पर्यायी माध्यमांची तीव्र स्पर्धा असूनही छापील वृत्तपत्रांनी आपले स्थान टिकवून ठेवले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टीव्ही, रिडिओ, डिजिटल आणि मोबाईल अशा पर्यायी माध्यमांची तीव्र स्पर्धा असूनही छापील वृत्तपत्रांनी आपले स्थान टिकवून ठेवले आहे एवढेच नव्हे तर त्यांचा खप आणि प्रकाशन केंद्रांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. जगातील अन्य प्रमुख देशांमधील स्थिती याहून नेमकी उलटी असताना भारतात छापील वृत्तपत्रांनी घट्ट पाय रोवून उभे राहणे विशेष उल्लेखनीय आहे.भारतातील सुमारे एक हजार दैनिक वृत्तपत्रे, साप्ताहिकेस नियतकालिके व वार्षिक प्रकाशनांच्या खपाचे अधिकृत प्रमाणीकरण करणाऱ्या ‘आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशन’तर्फे (एबीसी) मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा माहिती देण्यात आली. ब्युरोच्या आकडेवारीनुसार सन २००६ ते २०१६ या दशकात भारतात छापील वृत्तपत्रांच्या दैनिक खपामध्ये वार्षिक सरासरी ४.८७ टक्के दराने वाढ झाली प्रतींमध्ये २.३७ कोटींनी वाढ झाली. सन २००६ मध्ये खपणाऱ्या ३.९१ कोटी प्रती वाढून सन २०१६मध्ये ६.२८ कोटी एवढ्या झाल्या. याच काळात वृत्तपत्र प्रसिद्धीची केंद्रेही २५१ ने वाढून ९१० वर गेली.या वाढीचा देशाच्या विभागवार विचार केला तर सर्वाधिक ७.८३ टक्के वाढ उत्तर विभागात तर सर्वात कमी वाढ (२.६३ टक्के) पूर्व विभागात दिसून आली. वृत्तपत्रांचा खप या दशकात दक्षिण विभागात ४.९५ टक्क्यांनी तर पश्चिम विभागात २.८१ टक्क्यांनी वाढला.ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार भाषावार विचार केला तर हिंदी वृत्तपत्रांचा खप सर्वाधिक ( सरासरी वार्षिक ८.७६ टक्के) तर बंगाली वृत्तपत्रांचा सर्वात कमी वाढल्याचे दिसते (१.४९ टक्के). या काळात मराठी वृत्तपत्रांच्या खपात वार्षिक सरासरी १.५० टक्के एवढी वाढ झाली.खप आणि प्रकाशन केंद्रे सतत वाढत असल्याने छापील वृत्तपत्रे आजही जाहिरातीच्या उत्पन्नाचे एक प्रमुख साधन म्हणून आपले स्थान टिकवून आहेत, याकडेही ब्युरोने आवर्जून लक्ष वेधले.वृत्तपत्रांच्या यशाची कारणे -साक्षरता व शिक्षण यात वाढ होत असल्याने वृत्तपत्रांचे वाचक वाढत आहेत.आर्थिक विकास आणि शहरीकरण यामुळे लोकांच्या वाढत्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वृत्तपत्रांची गरज वाढली आहे.वृत्तपत्रे सोईनुसार केव्हाही वाचता येत असल्याने वृत्तपत्र वाचन हे नित्य दिनक्रमाचा सहजपणे एक अंग बनते.वृत्तपत्रे घरपोच मिळतात.किंमतीच्या दृष्टीने विचार केला तर वृत्तपत्रे हे जगाजी खबरबात जाणून घेण्याचे सर्वात स्वस्त माध्यम आहे.स्वतंत्र विभाग, पूलआऊट व स्थानिक बातम्या यामुळे वृत्तपत्रांमध्ये वाचकांच्या सर्वच वर्गासाठी मजकूर असतो.अजूनही लोकांचा छापील बातमीवर विश्वास कायम आहे व म्हणूनच वृत्तपत्रे आपली विश्वासार्हता टिकवून आहेत.