Join us  

सगळ्यांचीच अरेरावी, समजून घ्यायचेच नाही तर मत द्यायचे तरी कसे...?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 2:16 PM

...जवळ फोन आहे म्हटल्यावर मतदान करता येणार नाही, तुम्ही फोन आणि बॅग घरी ठेवून या, आणि मग मतदान करा, अशी कडक सूचना पोलिसांनी दिली. 

नीलेश अडसूळ -

मुंबई : सकाळी ८ वाजता मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलो. माझ्या आधी काही लोक उभे होते, काहीसा वाद सुरू होता...असेल काहीतरी असे म्हणून दुर्लक्ष करत गेटच्या आत शिरलो. तर तिथेच अडवण्यात आले. फोनबद्दल चौकशी करण्यात आली. जवळ फोन आहे म्हटल्यावर मतदान करता येणार नाही, तुम्ही फोन आणि बॅग घरी ठेवून या, आणि मग मतदान करा, अशी कडक सूचना पोलिसांनी दिली. दुरून आलेल्या अनेकांनी पोलिसांना विनंती केली की, आम्ही फोन बंद ठेवतो पण आम्हाला जाऊ द्या, मतदान करू द्या. पण पोलिसांनी काही ऐकले नाही. अरेरावीची भाषा आणि हुज्जत यामुळे बराच वाद निर्माण झाला. सकाळी सकाळी हे चित्र पाहून अनेकजण मतदान न करता कामाला गेले. धारावीतली बरीच माणसे दिवा, कळवा, डोंबिवली, पनवेल, वसई, विरार अशा लांबच्या ठिकाणी स्थलांतरित झाली आहेत. तरीही केवळ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ती आली होती. एवढ्या लांबून येणार म्हणजे माणसाकडे फोन असतोच. पण केवळ त्यांच्याकडे फोन आहे, म्हणून तुम्ही मतदान करू नका हे सांगणे किती योग्य आहे? केवळ धारावीच नाही तर मुंबईत अनेक ठिकाणी ही परिस्थिती होती. तुम्ही तुमचा फोन आणि पर्स, बॅग कुणाकडे तरी द्या, तेही तुमच्या रिस्कवर. हा दुसरा पर्याय सुचवण्यात आला. पण तिऱ्हाईताकडे कोण आपल्या वस्तू सोपवणार? शेवटी काहींनी विनंती करून पाहिली, अगदीच नाइलाज झाल्यानंतर मतदान न करताच परत फिरली. आता मुद्दा कामावर जाणाऱ्या लोकांचा. सोमवार असल्याने अनेक खासगी कंपन्यांना सुटी नव्हती. तुम्ही तुमचे मतदान सकाळी लवकर करून या असं कंपन्यांनी सांगितले होते. असे अनेक कर्मचारी सकाळी मतदान करून कामावर जाऊ या हिशेबाने घरातून निघाले, पण तुमचा फोन चालणार नाही, बॅग चालणार नाही म्हणून त्यांनाही पोलिसांनी हुसकावून लावले. अशावेळी घरी जाऊन,  फोन ठेवून, पुन्हा मतदान केंद्रावर जाऊन, मत देऊन, पुन्हा घरी जाऊन मग कामाला जाणे कोण पसंत करेल... त्यात पंच टाईम प्रत्येकालाच महत्त्वाचा आहे. म्हणून अशी अनेक मंडळी मत न देताच परत फिरली. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४मतदान